पाच वर्षात ३६ तरूणींचा स्वप्नभंग
By Admin | Updated: May 7, 2015 00:39 IST2015-05-07T00:39:14+5:302015-05-07T00:39:14+5:30
सात जन्म सोबत राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उपवधूंचा संसार थाटण्यापूर्वीच उद्ध्वस्त झाला आहे....

पाच वर्षात ३६ तरूणींचा स्वप्नभंग
कारण हुंड्याचे : पण मोबाईलवरून दुरावतात संबंध, खासगी आयुष्यात डोकावण्याचा परिणाम
गोंदिया : सात जन्म सोबत राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उपवधूंचा संसार थाटण्यापूर्वीच उद्ध्वस्त झाला आहे. सात जन्माचे स्वप्न रंगविणाऱ्या त्यातील काही जणींवर हुंडा तर काहींवर गैरसमजूतीमुळे लग्न मोडण्याची पाळी आली आहे. परिणामी पाच वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ३६ तरूणींच्या स्वप्नांचा चुराडा झाला. ही ३६ प्रकरणे पोलिसांपर्यंत आलेली आहेत. प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मोबाईल पोहोचला आहे. पहिल्यांदा मुलाने मुलीला पाहिल्यावर मुलगी मनात ठसताच नियोजित वर मुलीचा मोबाईल नंबर मागतोे. यातच त्यांचे मोबाईलवर तासन तास बोलणे सुरू होते. समाजातील जेष्ठ नागरिकांच्या मदतीने त्यांचे लग्न जुळले असले तरी ते प्रेमवीर असल्याप्रमाणे बोलायला लागतात. बोलता-बोलता त्या दोघांमध्ये वैयक्तिक जीवनाबद्दलच्या गप्पा मारल्या जातात. यातच ते एकमेकांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील माहिती विचारतात.
तुला आवडणारा मुलगा कोण होता इथपासून मुलगा विचारतो. तर मुलगी तुमची कोणी पे्रयसी होती का, यापासून विचारणा करीत असते. यातून त्या दोघांचे संभाषण मध्यरात्रीपर्यंत चालते. दररोज बोलण्याचा एकच उपक्रम असल्यामुळे अधिक बोलणार तरी काय, म्हणून ते बोलता-बोलता एकमेकांवर शंका घेऊन आरोप करू लागतात. अशातच त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. एकमेकांचे अफेयर माहिती पडले की लग्न मोडण्यापर्यंत दोघांची मजल जाते. प्रकरण मोठे झाले की लग्न मोडले जातात. परंतु या प्रकरणाला मुलीकडील मंडळी हुंडा मागीतल्याच्या कारणावरून त्यांना तुरूंगात टाकतात.
लग्न मोडण्याचे कारण कोणतेही असो, लग्न हुंड्यामुळे मोडले हीच प्रचलीत प्रथा समाजात आहे. हुंडाबंदी कायदा कलम ४, ५ चा वापर होत असतो. लग्न मोडण्यासाठी सर्वात प्रथम कारण मोबाईलवर त्या दोघांचे होणारे संभाषण हे आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे समाजातील काही समाजकंटक उपवराच्या विरोधात मुलींच्या नातेवाईकांना किंवा वधूच्या विरोधात मुलाकडील मंडळींना चुकीची माहिती देऊन त्यांचे लग्न मोडण्यात महत्वाची भूमिका बजावतात. परंतु त्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे चुकीचे असते.
समाजकंटक कुणाचे भले होताना पाहू शकत नाही, ते मुलगा किंवा मुलीसंदर्भात चुकीची माहिती पसरवून त्यांचा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. असे समाजकंटक दोन्ही पक्षाच्या समोर आले तर त्यांना सामूहिक मार खावा लागतो. संशयाची सुई लोकांच्या जीवनात टाकण्यासाठी ग्रामीण भागात असे समाजकंटक अनेक आहेत. लग्नाच्या पूर्वीच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय निर्माण होत असल्यामुळेही लग्न मोडतात.
अशा विविध कारणामुळे लग्न मोडले तरी त्याला हुंड्याचे स्वरूप देऊन मुलांना अडकविण्याचा प्रयत्न मुलीकडील मंडळी करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात सन २०१० ते एप्रिल २०१५ पर्यंत ३६ तरूणींचे लग्न मोडल्याची नोंद घेण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनजागृतीमुळे झाले हुंड्याचे प्रमाण कमी
शासनाने गावागावात हुंडाबंदी समित्या स्थापन केल्या. परंतु त्यांनी गावातील हुंडा पध्दतीवर अंकुश घालण्यासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न न केल्यामुळे या हुंडाबंदीसाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या माध्यमातून हुंड्यासंदर्भात गावागावात जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आता सुशिक्षित वर्गातील लोकांकडून हुंडा मागण्याची प्रथा नष्ट होत आहे. तरी काही लोक आपल्या समाजातील हुंड्याची वाईट प्रथा सोडण्याच्या मानसिकतेत राहात नाही. हुंड्याचे स्वरूप बदलले
हुंड्यात रोख रक्कम, मौल्यवान दागिने हेच राहायचे. परंतु आता लग्न समारंभासाठी वाहन खर्च द्या, लग्न मोठ्या शुभमंगल कार्यालयात करा, अशी विविध प्रकारची मागणी मुलाकडून मुलीकडील मंडळींना करण्यात येते. आता हुंड्याचे स्वरूप काही प्रमाणात बदलले आहे.