१२३ शेतकऱ्यांच्या पैशाचे गौडबंगाल
By Admin | Updated: September 28, 2015 02:10 IST2015-09-28T02:10:01+5:302015-09-28T02:10:01+5:30
शेतीविषयक माहिती आपल्याला मिळावी यासाठी १२३ शेतकऱ्यांनी ‘शेतकरी’ मासिकासाठी जमा केलेली रक्कम गायब झाल्याने गावातील

१२३ शेतकऱ्यांच्या पैशाचे गौडबंगाल
परसवाडा : शेतीविषयक माहिती आपल्याला मिळावी यासाठी १२३ शेतकऱ्यांनी ‘शेतकरी’ मासिकासाठी जमा केलेली रक्कम गायब झाल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला. दरम्यान या मुद्द्यावरून ग्रामपंचायत सदस्य सरिता बाबुलाल परिहार यांनी कृषी सहायकावर दबाव टाकत गावकऱ्यांनाही धमकी दिल्याचा आरोप तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह इतर गावकऱ्यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती व मार्गदर्शनासाठी कृषी सहायक सलामे यांनी मागील वर्षी शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत उन्हाळी धानपीक प्रात्यक्षिक दिले होते. त्याचवेळी ‘शेतकरी’ मासिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना सूचविले. शेतकऱ्यांनी शेतीविषयक माहिती मिळेल म्हणून त्यासाठी प्रतिशेतकरी १५० रूपये गोळा केले. कृषी सहायक सलामे यांनी ग्रामपंचायत सदस्य सरिता परिहार यांचे पती व पाणलोट समितीचे सचिव बाबुलाल परिहार यांच्याकडे ती जमा करण्यास सांगितले. त्यानुसार एकूण २५० शेतकऱ्यांनी १५० प्रमाणे ३७ हजार ५०० रूपये जमा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र एक वर्षाचा काळ लोटूनही शेतकऱ्यांना मासीक मिळाले नाही. २२ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी पाणलोट सचिव बाबुलाल परिहार यांना विचारले असता कृषी सहायक सलामे यांच्याकडे ती रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पण कृषी सहायक सलामे यांनी फक्त १२७ शेतकऱ्यांचे पैसे मिळाले असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. ते पैसे शेतकऱ्यांना परत करणार असे म्हणून कृषी सहायक सलामे यांनी दि. २४ सप्टेंबरला ग्राम पंचायत कार्यालयात येऊन १२७ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत करणे सुरु केले असताना ग्रामपंचायत सदस्य सरिता परिहार यांनी कृषी सहायकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
१२३ शेतकऱ्यांचे नाव यादीत नसल्याने पाणलोट सचिव परिहार यांनी ते पैसे हडप केले, असा आरोप त्यावेळी काही शेतकऱ्यांनी केला असता ग्रा.पं. सदस्य सरीता परिहार यांनी आपल्या पतीवरील आरोप फेटाळून लावत त्या लोकांना शिवीगाळ केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यावेळी कृषी सहायक सलामे यांना सचिव परिहार आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत करा, असाही दबाव ग्रामपंचायत सदस्याने टाकल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.पाणलोट सचिव व ग्रामपंचायत सदस्यपदाचा दुरूपयोग करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तंमुस अध्यक्ष गुड्डू परिहार, जितेंद्र बिसेन, टोई बिसेन, पुष्पराज परिहार, तेजराम पटले, हौशीलाल बिसेन या शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)