जिल्ह्यातील 1149 शाळा होणार सुरू सोमवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:00:02+5:30
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. यासाठी शाळांना शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी सध्या लगबग सुरु असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील 1149 शाळा होणार सुरू सोमवारपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र सरकारने वर्ग ५ ते ७ वी च्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णय घेतल्याने गोंदिया जिल्ह्यातील ११४९ शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या शाळांत गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५१९ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत. परंतु वर्ग ५ ते १२ वी च्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग ५ ते १२ वीच्या १०२६ शाळा तर शहरी भागातील ८ ते १२ वी च्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील ५ ते ७ वीचे ४१ हजार ६३३ विद्यार्थी, तर ८ ते १२ वीचे ६४ हजार ३८८ विद्यार्थी शाळेत जाणार आहेत.
शहरी भागातील वर्ग ८ ते १२ वी चे २९ हजार ४९८ विद्यार्थी शाळेत जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
चार ऑक्टोबरला वाजणार शाळांची घंटा
- जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. यासाठी शाळांना शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी सध्या लगबग सुरु असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनंतर वर्ग १ ते ४ च्या उघडणार शाळा
- शिक्षण अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ३० सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बैठकीत वर्ग १ ते ४ च्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु दिवाळीनंतरही निवासी शाळा बंदच राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
पालकांची काळजी कायम
मागील जवळपास दीड वर्षांनंतर पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी पालकांचे सहमतीपत्र सादर करावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. थोडी काळजी देखील आहे.