दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 08:31 AM2024-03-03T08:31:32+5:302024-03-03T08:32:34+5:30

ख्रिस्ती धर्मगुरु हे शिक्षित व हुशार आहेत. ते एका बैठकीमुळे भाजपच्या प्रेमात पडतील, असे कुणी समजू नये.

will christians and st decide the outcome of south goa lok sabha election 2024 | दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका!

दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका!

- सद्गुरु पाटील

ख्रिस्ती व मुस्लिम मिळून दक्षिणेतील ४० टक्के मतदार हे अल्पसंख्यांक वर्गातील आहेत. मुरगाव, फोंडा आणि सासष्टी या तीन तालुक्यांत मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मध्यंतरी भाजपचे प्रभारी राजीव चंद्रशेखर गोव्यात येऊन गेले होते. त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंची एक बैठक आलेक्स सिक्वेरांच्या घरी घेऊन ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न केला होता. ख्रिस्ती धर्मगुरु हे शिक्षित व हुशार आहेत. ते एका बैठकीमुळे भाजपच्या प्रेमात पडतील, असे कुणी समजू नये.

दक्षिण गोव्यात खिस्ती मतदारांची संख्या थोडी घटलेली असली, तरी लोकसभा निवडणुकीत यावेळी खिस्ती बांधवांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर हिंदू एसटी समाज हाही महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. हे दोन्ही घटक तसे मनातून दुखावलेले आहेत. भाजपकडून कुणाला तिकीट दिले जाते, ते पाहून काही महत्त्वाचे एसटी बांधव आपली भूमिका ठरवणार आहेत. खिस्ती मतदार खुश नाही. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन जे नेते भाजपमध्ये उही टाकतात, ते नेते स्वतः श्रीमंत होतात, स्वतःची तुंबडी भरतात, अशी खंत अनेक खिस्ती लोक व्यक्त करीत आहेत. 

भाजप व काँग्रेसचे उमेदवार कोण असू शकतात, हे जाणून घेण्याची सर्वाधिक उत्सुकता ही खिस्ती मतदारांना आहे. काँग्रेस पक्षही मतदारांना गृहित धरू शकत नाही. काँग्रेस व आम आदमी पक्ष यांची युती झालेली आहे, ही जमेची बाजू आहेच. मात्र, काँग्रेसने तिकीट वाटपावेळी चूक केली व कुठल्याही नेत्याला तिकीट दिले तर खिस्ती बांधव ते सहन करणार नाहीत, असे संकेत मिळतात, आरजी पक्षाचा उमेदवार रुपर्ट परेरा या युवकाला कमी लेखता येत नाही, आरजीने प्रचाराबाबत आघाडी घेणे सुरू केले आहे. जिथे जावे तिथे आरजीचे फलक लागलेले आहेत. आता फक्त आरजी, असे रोमन कोंकणीत लिहिलेले फलक सासष्टीत सगळीकडे दिसून येतात. 

पूर्ण दक्षिण व उत्तर गोव्यात फलक आहेतच, विजय सरदेसाई यांच्या फातोडा मतदारसंघातही फलक झळकले आहेत, केवळ पोस्टर्स लावून आरजीवाले थांबलेले नाहीत. ते सगळीकडे फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत, आरजीचे रुपर्ट परेरा यांच्याकडून एसटी व खिस्ती बांधवांची मते फोडली जातील, त्यावरही भाजप किंवा कॉंग्रेस यांचा जय- पराजय अवलंबून असेल. निवडणूक आचारसंहिता येण्यापूर्वीच आरजीने सर्व सार्वजनिक ठिकाणी पोस्टर चिकटविण्याची खेळी खेळली आहे. यावेळी आरजीच्या कार्यकर्त्यांनी काही मंत्र्यांचे टेन्शन वाढवले आहे. मंत्री सुदिन ढवळीकर, गोविंद गावडे यांच्यासह अनेकांना दाहक अनुभव येत आहे.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यात चार ठिकाणी लीड मिळाली नव्हती, चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पिछाडीवर होता. तिथे भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळाली नव्हती, २०१९ च्या लोकसभा निवडणु‌कीवेळीही मोदीची लाट होती, पण दक्षिणेतील तब्बल दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची पिछेहाट झाली होती. त्यावेळी दहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती, तेच भाजपच्या पराभवाचे कारण ठरले. यावेळी भाजपची स्थिती वेगळी आहे. 

यावेळी दिगंबर कामत, रवी नाईक, रमेश तवडकर, बाव कवळेकर, संकल्प आमोणकर हे सगळे भाजपमध्ये आहेत, खिस्ती मतदारांची मते भाजपला पूर्वीही मिळाली नाही व आताही कदाचित मिळणार नाही, पण ती कमतरता भाजपकडून अन्य हिंदू मतदारसंघांमध्ये भरून काढली जाण्याची शक्यता आहेच, शिरोडा, मडगाव, फोंडा, काणकोण, केपे, मुरगाव, मडकई असे काही मतदारसंघ यावेळी भाजपला जास्त आश्वासक वाटतात. समजा सासष्टीत खिस्ती मते कमी मिळाली, तरी विविध मतदारसंघांतील हिंदू मतदारांची मते आपल्यालाच मिळतील, असे भाजपने गृहित धरले आहे. हिंदू मतदार व विशेषतः भंडारी समाजातील मतदार यावेळी काय करतो, ते पहावे लागेल. कुठ्ठाळीचे आंतोन वास, कुडतरीचे आलेक्स रेजिनाल्ड, नुवेचे आलेक्स सिक्वेरा, दाबोळीचे माविन मुविन्हों हे खिस्ती मतदारांमधील थोडी जरी मते भाजपसाठी वळवू शकले, तर भाजपचे जास्त नुकसान होणार नाही. 

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे हे कालच माझ्याशी बोलत होते. यावेळी दक्षिण व उत्तर गोवा या दोन्ही ठिकाणी आम्ही खूप सुरक्षित स्थितीत आहोत, असे तानावडे म्हणाले, दक्षिण गोव्यात मुख्यमंत्री अजून फक्त साठ हजार मतांच्या आघाडीविषयी बोलतात, भाजपचा उमेदवार साठ हजार मतांच्या आघाडीने निवडून येईल, असा दावा मुख्यमंत्री करतात, वास्तविक आता काँग्रेसमधील दक्षिणेतील सगळेच (केवळ दोन वगळता) आमदार भाजपने आपल्या तंबूत आणलेले असल्याने एक लाखांची आघाडी यावेळी मिळेल, एवढे तरी बोलण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवा, अन्यथा आलेक्स सिक्वेरा, रवी नाईक, संकल्प, दिगंबर कामत वगैरे भाजपमध्ये येऊन फायदा तो काय? भाजपकडून जो उमेदवार उभा केला जाईल, त्या उमेदवाराचीही स्वतःची म्हणून वेगळी मते असतील ना? शिवाय भाजपच्या केडरची मते. शिवाय दक्षिणेतील सगळे हेवीवेट भाजपलाच साथ देत आहेत. 

सुदिन ढवळीकरांपासून माजी आमदार चर्चिल आलेमात देखील भाजपलाच जिंकून देण्याची भाषा करीत आहेत. मग, भाजप केवळ साठ हजार मतांचीच आघाडी मिळेल असे का घोलतो? आत्मविश्वास हलला आहे काय? दामू नाईक, नरेंद्र सावईकर व बाबू कवळेकर असे तीन उमेदवार इच्छुक असताना व ते खूप धडपडत असतानाही भाजपचे हायकमांड तिकीट देखील आहीर करीत नाही, याचा अर्थ काय? सर्वे रिपोर्ट ठिक आलेले नाहीत काय? की कॉंग्रेसचे युरी व एल्टन हे शिल्लक दोन आमदार देखील भाजपमध्ये यायला हवे, मग भाजपला दक्षिणेत पूर्ण सुरक्षित वाटेल? नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न भाजपच्या केडरलाही पडला असेल, दक्षिण गोव्यातील अनेक खिस्ती मतदारांनी यूरोपमध्ये स्थलांतर केलेले आहे, कामाधंद्यानिमित्त तिथेच राहणारे अनेकजण मतदान करण्यासाठी देखील सासष्टीत येत नाहीत. 

बाणावली, नुवे, कुडतरी, कुठ्ठाळी, वेळ्ळी, मडगाव, नावेली आदी अनेक मतदारसंघातील गोंयकार विदेशात राहतात. भाजपसाठी ही चांगली गोष्ट असेल, कारण, एरव्ही म्हणून ते गोव्यात मतदानाला आले, तरी त्यांचे मत आपल्याला मिळणार नाही हे भाजप नेत्यांना ठाऊक आहे. यावेळी आप व काँग्रेस यांची युती आहे आणि आपकड़े बाणावली व वेळ्ळी हे दोन मतदारसंघ आहेत, भाजपसाठी ही तेवढी चिंतेची गोष्ट ठरते. 

विजय सरदेसाई यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत स्वत:कडे कोणतीच मोठी भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या फातोडा मतदारसंघात काँग्रेसला की भाजपला आघाडी मिळते ते पहावे लागेल, फ्रान्सिस सार्दिन यांनी पूर्वी तिथे आघाडी घेऊन दाखवली आहे. ख्रिस्ती व मुस्लिम मिळून दक्षिणेतील ४० टक्के मतदार हे अल्पसंख्यांक वर्गातील आहेत. मुरगाद, फोंडा आणि सासष्टी या तीन तालुक्यांत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. रवी नाईक यांनी आपण भाजपला फोंड्यात किती मतांची आघाडी देईन ते मुद्दाम अजून सांगितलेले नाही, कारण, त्यांना भाजपचा उमेदवार कोण ते पाहायचे आहे. 

मध्यंतरी भाजपचे प्रभारी राजीव चंद्रशेखर गोव्यात येऊन गेले होते. त्यांनी खिस्ती धर्मगुरुची एक बैठक आलेक्स सिक्वेरांच्या घरी घेऊन ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न केला होता, खिस्ती धर्मगुरु हे शिक्षित व हुशार आहेत, ते एका बैठकीमुळे भाजपच्या प्रेमात पडतील, असे कुणी समजणारही नाही व समजूही नये, काँग्रेस पक्ष जर दक्षिण गोव्यात खिस्ती धर्मिय उमेदवार देणार असेल, तर कदाचित रंगत वाढेल. गिरीश चोडणकर यांनाही काँग्रेसने तिकीट दिले तरी, यावेळी लढत रंगणारच आहे. 

अर्थात भाजपकडे जास्त आमदार व हेवीवेट नेते असल्याने तूर्त भाजपसाठीच पोषक वातावरण आहे, असा निष्कर्ष काही विश्लेषक काढतील. मात्र, एकदम कोणताच अंतिम निष्कर्ष राजकारणात कुणी काढू नये, हेही तेवढेच खरे आहे. भाजपचे काही आमदार छुपे राजकारण खेळत आहेत. ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून असतात, तेव्हा आपल्या विधानसभा मतदारसंघात ते स्वतःला लीड प्राप्त करतात. मात्र, तिच मते लोकसभा निवडणुकीवेळी दुसऱ्यासाठी म्हणजे भाजपच्याच उमेदवारासाठी ते ट्रान्सफर करत नाहीत, असे देखील पूर्वी घडलेले आहे.
 

Web Title: will christians and st decide the outcome of south goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.