गोविंद गावडेंची विधानसभेत काय असणार भूमिका? विरोधी सूर लावणार की, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:33 IST2025-06-30T14:33:09+5:302025-06-30T14:33:57+5:30
लोकांमध्ये उत्कंठा

गोविंद गावडेंची विधानसभेत काय असणार भूमिका? विरोधी सूर लावणार की, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलणार
लोकमत न्यूज नेटवर्क,पणजी : येत्या विधानसभा अधिवेशनात आमदार गोविंद गावडेंची भूमिका काय असेल, ते विरोधी सूर लावणार की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून, ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सत्तेत असले तरी आमदार म्हणून गावडे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करू शकतात. प्रसंगी सरकारविरुद्ध टीकेचा सूरही लावू शकतात. त्यांची नेमकी भूमिका काय राहील, याबाबत लोकांमध्ये व खासकरून कलाकारांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यास गोविंद गावडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे निश्चित मानले जात आहे. भाजप त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाही. नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सध्या तरी आपण भाजपसोबतच असल्याचे विधान त्यांनी केले आहे. तसेच प्रियोळच नव्हेतर गोव्यातील 'लोक माझ्यासोबत आहेत. मी पैशांच्या बंडलांनी नव्हे, तर लोकांची दुःखे पुसून मनाने, काळजाने लोक जोडलेले आहेत. जनता माझ्या पाठीशी आहे.', असेही ते म्हणाले होते. यावरून पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून लढण्यासाठी त्यांनी मनाची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.
कला अकादमीचा विषय ठरणार लक्षवेधी
कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या बाबतीत झालेले निकृष्ट बांधकाम, तसेच सदोष साऊंड व प्रकाश योजनेचा प्रश्नही विधानसभेत येणार आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रश्नावर आपण सरकारला घेरणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. विरोधी काँग्रेस तसेच आरजी व आपचे आमदारही यावर आवाज उठवणार आहेत. तेव्हा मुख्यमंत्री काय उत्तर देतील व गोविंद यांची काय भूमिका असेल, याबाबत उत्कंठा आहे.
प्रश्न मांडण्यांची संधी
गेली आठ वर्षे गावडे मंत्री होते. आमदार म्हणून त्यांना प्रियोळ मतदारसंघातील समस्यांबाबत सरकारला जाब विचारण्याची संधी प्रथमच मिळणार आहे. गावडे यांचा आक्रमक स्वभाव पाहता मतदारसंघातील अनेक विषय ते प्रश्नोत्तराच्या तासाला, शून्य प्रहराला, लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करण्याची शक्यता आहे.
भोम महामार्गाबाबतीत गावडेंची भूमिका काय असेल याबाबतही उत्सुकता आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले व अपक्ष म्हणून रिंगणात राहावे लागले, तर भोमवासीयांना दुखवून चालणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे.
विरोधी पक्षांनी नोकरीकांड, म्हादई, वाढती बेकारी व महागाई तसेच इतर ज्वलंत प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी आमदारांना बोलण्याची संधी मिळणार आहे. गावडे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.