मौनीबाबा आम्हाला नकोत, बोलणारे नगरसेवक हवेत!: उत्पल पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:00 IST2026-01-25T09:00:30+5:302026-01-25T09:00:30+5:30
मनपा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांचा पर्याय देणार

मौनीबाबा आम्हाला नकोत, बोलणारे नगरसेवक हवेत!: उत्पल पर्रीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पणजीच्या विषयांवर बोलणारे नगरसेवक आम्हाला हवे आहेत, मौन पाळणारे नकोत. त्यामुळे आगामी पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीत पणजीवासीयांना चांगल्या उमेदवारांचा पर्याय देणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी काल सांगितले. आपण मनपा निवडणुकीबाबत आपण सध्या पणजीतील विविध घटकांतील लोकांशी चर्चा करत आहे. यात काही जुन्या तसेच नव्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मनपा निवडणूक म्हणजे केवळ नगरसेवक निवडणे नाही, तर ती पणजीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच इतर सर्वच घटकांवर परिणाम करणारी आहे.
सध्या मनपाच्या नियमित बैठका होत नाहीत. नगरसेवक पणजीच्या विषयांवर काहीच बोलत नाहीत. ते मौन पाळून गप्प बसतात. आम्हाला बोलणारे नगरसेवक हवेत, गप्प बसणारे नकोत. त्यामुळेच आगामी निवडणुकीत शहराचे तसेच येथील प्रश्नांवर बोलणारे, काम करणारे उमेदवार लोकांना देणार आहोत. त्यासाठी लोकांच्या भेटीगाठी घेत असल्याचेही उत्पल यांनी सांगितले.
फेररचना व आरक्षण जाहीर होताच पत्ते उघड करणार मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या फक्त मी लोकांशी चर्चा करत आहे. मात्र प्रभाग फेररचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतरच याबाबतचे पत्ते आपण उघड करू. सध्याचे पणजीचे आमदार कुठलाही प्रश्न विचारल्यास टाळाटाळ करतात.
मात्र माझे बाबा मनोहर पर्रीकर हे आमदार असताना तसेच मुख्यमंत्री असताना देखील पणजीच्या लहानसहान विषयांवर लक्ष देत. लोकांना ते भेटत. मात्र आता तसे होत नाही. त्यामुळेच मनपा निवडणूक ही केवळ नगरसेवकांपुरती मर्यादित नसून एकूणच पणजीचा चेहरमोहरा ठरविणारी आहे, असेही उत्पल यांनी सांगितले.
राजधानी पणजीत आही अनेक समस्या आहेत. बेकायदेशीर स्पा, जुन्ता हाऊस इमारतीच्या जागी येणारा प्रकल्प जो पणजीच्या कुठल्याही फायद्याचा नाही, यासह विविध समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र आज या सर्व समस्यांकडे महापौरांसह सर्वजण दुर्लक्ष करीत आहेत. यात बदल होण्याची गरज असल्याचेही पर्रीकर यांनी नमूद केले.