विजय सरदेसाईंचे शक्तिप्रदर्शन; स्वबळावर पालिका निवडणुकीचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:18 IST2025-06-17T12:17:24+5:302025-06-17T12:18:42+5:30
गोवा फॉरवर्ड स्वबळावर पालिका निवडणूक लढवील, अशी घोषणा त्यांनी केली आहेच.

विजय सरदेसाईंचे शक्तिप्रदर्शन; स्वबळावर पालिका निवडणुकीचे राजकारण
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोडाचे आमदार विजय सरदेसाई यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शन केले. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विजयनी धडाक्यात शक्ती दाखवून दिली. सरदेसाई यांचे प्रमुख शत्रू आता प्रमोद सावंत नाहीत, तर त्यांचे प्रमुख शत्रू दिगंबर कामत झाले आहेत. मडगावचे आमदार कामत यांनी अगोदर भाजपमध्ये उडी टाकल्याने विजय दुखावले गेले. विजय हे दुःख अजून विसरलेले नाहीत, हे त्यांच्या बर्थ डे वेळच्या भाषणातूनही कळून आले. मडगाव पालिका निवडणुकीवेळी कामत यांना धक्का देण्याची विजय यांची योजना आहे. गोवा फॉरवर्ड स्वबळावर पालिका निवडणूक लढवील, अशी घोषणा त्यांनी केली आहेच. मुख्यमंत्री सावंत यांनी फोन करून विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असे सांगितले जाते.
अर्थात मुख्यमंत्री फोन करतातच आणि बर्थ डे शुभेच्छांसाठी करायलाही हवा. वास्तविक २०२५ हे वर्ष काही निवडणूक वर्ष नव्हे. तरीदेखील सरदेसाई यांनी आपला प्रभाव दाखवण्याच्या हेतूने शक्तिप्रदर्शन केले. फातोर्डा, मडगाव व परिसरातील काही लोकांना व तरुणांना विजय यांची कार्यशैली आवडते. काही ख्रिस्ती धर्मगुरूंचेही विजय यांच्या कामावर लक्ष असते. जर तुम्ही भाजपमध्ये गेलात, तर तुमच्या घरासमोर आपण उपोषणास बसेन असा इशारा म्हणे साष्टीतील एका पाद्रीने विजयना दिला होता. आपण भाजपमध्ये जाणार नाही, असा शब्द त्यांना दिला होता व आपण तो पाळला, असे सरदेसाई परवा बोलले. विजय यांची पुढील राजकीय दिशा काय असेल ? भाजप सरकारला टक्कर देण्यासाठी ते काँग्रेसची किती निष्ठेने साथ देतील ? २०२७ च्या निवडणुकीवेळी विजय स्वतःला राज्यव्यापी नेता म्हणून प्रोजेक्ट करतील काय, या प्रश्नांची उत्तरे लोक शोधत आहेत.
सरदेसाई यांचे काँग्रेसच्या गोव्यातील नेतृत्वाशी पटत नाही, हे उघड आहे. सरदेसाईंच्या वाढदिनी गोव्यातील कुणी बडे काँग्रेस नेते त्यांच्या भेटीला गेले नाहीत. युरी आलेमाव व अमित पाटकर हे चार हात दूरच राहतात. सरदेसाई यांच्याकडे कार्यक्षमता, धाडस, अभ्यासूवृत्ती, वक्तृत्व आणि इंग्लिश भाषेवरील कमांड हे सगळे आहे, पण त्यांना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. डोके शांत ठेवून आपण यशस्वीपणे सर्वांचे नेतृत्व करू शकतो, हे आधी सिद्ध करावे लागेल. कारण गोवा फॉरवर्ड स्थापन झाल्यापासून आतापर्यंतच्या प्रवासात विजयना साथ देणारे मोजकेच राहिलेत. पूर्वी विजय अपक्ष असतानाही रोहन खंवटे वगैरे विजय यांचे मित्र होते. बाबूश मोन्सेरातही मध्यंतरी त्यांच्या आश्रयाला आले होते. जयेश साळगावकर, विनोद पालयेकरही येऊन गेले. विजय यांच्याशी कायम मैत्री ठेवणारे राजकारणी गोव्यात फार कमी आहेत. एखादे जुझे फिलिप डिसोझा किंवा राधाराव ग्रासियस सोबत राहिले म्हणून उत्तर गोव्यात मते मिळत नाहीत. सासष्टीबाहेरही मते मिळत नाहीत. सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डचा विस्तार केलेला नाही. जुवारी नदीच्या पलीकडे जर स्वतःचा राजकीय प्रभाव निर्माण करायचा असेल तर आपण कट्टर कोंकणीवादी आहोत ही स्वतःची प्रतिमाही त्यांना बदलावी लागेल, पेडणे, बार्देश, डिचोली व फोंडा तालुक्यातही एकतर्फी प्रतिमा चालत नाही. ती चालली असती तर स्वर्गीय जॅक सिक्वेरा हेच मुक्तीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले असते. पर्रीकर यांनी जाणीवपूर्वक आपली इमेज बदलली होती. कट्टर हिंदुत्ववादही पर्रीकर यांनी मांडवी-जुवारीत सोडून दिला होता. शिवाय आपली कट्टर सारस्वत अशी इमेज न ठेवता पर्रीकर यांनी बहुजन समाजातच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे विलीनीकरण केल्यासारखे चित्र तयार केले होते. त्यामुळेच पर्रीकर १९९९ नंतर बहुजनांमध्ये लोकप्रिय झाले.
विजय सरदेसाई यांना चांगले राजकीय भवितव्य आहे, पण आपण सिरियस राजकारणी आहोत व जनतेसाठी प्रसंगी केंद्र सरकारच्या यंत्रणांशीही लढण्यास तयार आहोत, हे विजयना दाखवून द्यावे लागेल. काहीजण विजय यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात. काँग्रेसमध्ये तुमचा पक्ष विलीन करा असेही सुचवितात. राजकीय क्षमता दाखविण्यासाठी २०२७ सालची निवडणूक विजय यांच्यासाठी शेवटची संधी असेल. दामू नाईक भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. फातोर्थ्याच्या पलीकडे आणि दक्षिण व उत्तर गोवा अशा दोन्ही ठिकाणी विजयना आपले बळ दाखवून देण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. भाजपला हरविता येते, पण विरोधकांकडे पूर्ण विश्वास ठेवण्याजोगे नेतृत्व अजून नाही, ही गोंयकारांची खरी वेदना आहे.