विजयना २४ तासांची मुदत; बिनशर्त माफी मागण्याचा सभापती गणेश गावकर यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:35 IST2026-03-10T09:34:43+5:302026-03-10T09:35:09+5:30
'सरदेसाई यांनी माफी न मागितल्यास नियमांनुसार पुढील कारवाई केली जाईल' असेही सभापतींनी बजावले.

विजयना २४ तासांची मुदत; बिनशर्त माफी मागण्याचा सभापती गणेश गावकर यांचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत निषेधाचे फलक दाखवून घोषणाबाजी केलेल्या मिराबागच्या आंदोलकांना आमदार विजय सरदेसाई यांनीच पास दिले होते, असे चौकशीत आढळून आले असल्याचे सभापती गणेश गावकर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सरदेसाई यांनी २४ तासांच्या आत सभागृहाची बिनशर्त माफी मागावी, असा आदेश त्यांनी सोमवारी दिला आहे.
'सरदेसाई यांनी माफी न मागितल्यास नियमांनुसार पुढील कारवाई केली जाईल' असेही सभापतींनी बजावले. गावकर म्हणाले की, 'प्रत्येक विधिमंडळ सदस्याने सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळायला हवी. अशा प्रकारे विधानसभेच्या कामकाजात घोषणाबाजी करून व्यत्यय आणणे हा सभागृहाचा हा घोर अपमान आहे. लोकप्रतिनिधींनी 'डेकोरम' पाळायला हवा.'
सभापती म्हणाले की, 'सभागृहात फलक फडकावून घोषणाबाजी करणारे हेमंत नाईक, उमेश नाईक, उपेंद्र नाईक व आपा नाईक या चौघांही निदर्शकांना विधानसभा आवारात फिरकण्यास प्रतिबंध केला आहे. आंदोलनाबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर याची माहिती सभागृहाला दिली जाईल. असे प्रकार यापुढे घडू नयेत याची खबरदारी घेतली जाईल.'
आधी बजेटवर, मग माफीवर बोलू
दरम्यान, माफी मागण्याच्या सभापतींनी दिलेल्या आदेशासंबंधी सरदेसाई यांना पत्रकारांनी विचारले असता, 'अजून आपल्याकडे २४ तास आहेत. आधी बजेटवर बोलू. नंतर या आदेशावर बोलू' असे म्हणत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
घटनेची पार्श्वभूमी
मिराबाग येथे बंधाऱ्याला विरोध करणाऱ्यांपैकी चौघा आंदोलकांनी ६ मार्च रोजी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, प्रेक्षक गॅलरीतून हातात फलक फडकावून आम्हाला मिराबाग बंधारा नको अशा घोषणा देत विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय आणला. सभापतींनी तत्काळ दखल घेत मार्शलकरवी चौघांनाही ताब्यात घेतले होते. आंदोलकांनी सरदेसाई यांनी पास दिल्याचे परंतु सरदेसाई यांना आमचा हेतू माहिती नव्हता, असे सांगितले होते.
'कोणाला अतिरेकी म्हटलेले नाही'
सभापती गावकर म्हणाले की, 'आंदोलकांकडून सभागृहात घोषणाबाजीचा प्रकार घडला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केले, त्याला काही घटक वेगळा रंग देऊन दिशाभूल करू पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक किंवा सभागृहात निदर्शने केलेल्या चौघांपैकी कोणालाही अतिरेकी म्हटलेले नाही.'
दीपक प्रभू-पाऊसकर यांची चार तास चौकशी
पणजी मिराबाग-सावर्डे येथील बंधारा प्रश्नावरून विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत झालेल्या निदर्शनाप्रश्नी सा. बां. खात्याचे माजी मंत्री दीपक प्रभू-पाऊसकर यांची सोमवारी पर्वरी पोलिसांनी सुमारे चार तास चौकशी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाऊसकर म्हणाले की, 'बंधाऱ्याला गेल्या दोन वर्षांपासून विरोध सुरू आहे. मिराबागचे लोक गेल्या २५ दिवसांपासून आंदोलन करीत आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच लोकशाही पद्धतीने विधानसभेच्या माध्यमातून सरकारपर्यंत मागण्या पोहोचवण्याचा आमचा हेतू होता.
पाऊसकर म्हणाले की, मिराबागच्या ग्रामस्थांनी फातोर्थ्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्याकडून विधानसभेसाठीचे पास घेतले होते. मात्र, तेथे निषेध फलक दाखवणार याची माहिती सरदेसाई यांना नव्हती. स्थानिक पंचायतीने प्रकल्पाची एनओसी रद्द केली. तरीदेखील सरकारने त्याची दखल घेतली नाही.
पंचायतीच्या निर्णयाला किंमत नाही का? त्यामुळेच आमचा आवाज लोकशाही पद्धतीने विधानसभेच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता' असे त्यांनी सांगितले. पाऊसकर म्हणाले की, 'मी सावर्डेचा आमदार असताना नेहमीच लोकांना साथ दिली. त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला. ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील.
अपमान करण्याचा हेतू नव्हता
माजी मंत्री पाऊसकर म्हणाले की, 'मुख्यमंत्री तसेच सभापतींचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. ग्रामस्थांनी तेथे कुठलीही घोषणाबाजी केली नाही. केवळ बंधारा प्रकल्प नको असे फलक दाखवले.'