आरोप करणाऱ्याची पात्रता नाही; उत्तर देणार नाही: विजय सरदेसाईंचे मनोज परब यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:48 IST2026-02-25T13:47:18+5:302026-02-25T13:48:17+5:30
मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय योग्य

आरोप करणाऱ्याची पात्रता नाही; उत्तर देणार नाही: विजय सरदेसाईंचे मनोज परब यांना प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आमदार विजय सरदेसाई यांनी मंत्री विश्वजित राणे यांच्या खाजगी निवासस्थानावरील मोर्चात सहभागी न होण्याच्या आपण घेतलेल्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले.
मनोज परब यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता कोणाचेही नाव न घेता सरदेसाई म्हणाले की, माझ्यावर ज्याने आरोप केले तो उत्तर देण्याच्या पात्रतेचा नाही. त्यामुळे मी यावर काहीच बोलणार नाही. आंदोलनाला येणारी माणसे म्हणजे गुरे नव्हेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असे वाटते की या लोकांना कोणी गुरांसारखे वागवू नये व तेवढेच मी सोमवारी बोललो. आंदोलनात महिला, मुलेही होती. त्यांचे बरे-वाईट झाले असते तर कोण जबाबदार होते ? सात किलोमिटर लोकांना चालत नेणे कितपत योग्य होते? कोणाच्याही खाजगी निवासस्थानावर मोर्चा नेणे मला मान्य नाही.
पर्सनल अजेंड्याने आंदोलन भरकटले
गोव्याच्या जमिनी वाचवण्यासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात आता राजकीय ठिणग्या पडू लागल्या आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर आणि सहसचिव विकास भगत यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषद घेत रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. मनोज परब हे आंदोलनाचा वापर स्वतःच्या 'पर्सनल अजेंड्या'साठी करत असून, त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळेच आंदोलनाची दिशा भरकटल्याचा आरोप लोलयेकर यांनी केला आहे.
नगरनियोजन कायद्याच्या १६-बी कलमाविरोधात आणि गोव्याची अस्मिता जपण्यासाठी आमदार वीरेश बोरकर यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला गोवा फॉरवर्डसह काँग्रेस, आप आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र, रविवारी मनोज परब यांनी कोणालाही विश्वासात न घेता अचानक नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्या खासगी बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अनपेक्षित होता आणि यामुळे आंदोलनाची मूळ ताकद विखुरली गेली, असे लोलयेकर म्हणाले. मनोज परब हे आमदार वीरेश बोरकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचे राजकारण करत आहेत, अशी टीकाही लोलयेकर यांनी केली आहे.
'मनोज परबांकडून जनतेची दिशाभूल'
लोलयेकर यांनी मनोज परब यांच्यावर भाजपशी 'सेटिंग' केल्याचा संशयही व्यक्त केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनोज यांच्या पक्षाने विरोधी मतांचे विभाजन करून भाजपला मदत केली. आता स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते आंदोलनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असून, जनतेची दिशाभूल करत आहेत, असे ते म्हणाले.
स्टंटबाजीला पाठिंबा नाही
लोलयेकर म्हणाले, की आम्ही अनेक आंदोलने केली, लाठ्या खाल्ल्त्या, पण कधीही मंत्र्यांच्या बंगल्यांवर जाऊन तडजोडी केल्या नाहीत. भाजप सरकारला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक आहे, मात्र मनोज परब यांच्यासारख्या बेभरवशाच्या नेत्यांमुळे या एकजुटीत मिठाचा खडा पडत आहे. गोव्याचे डोंगर आणि तळी वाचवण्यासाठी गोवा फॉरवर्ड कटिबद्ध आहे.