...म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला: दिगंबर कामत; विरोधी पक्षनेतेपदी डावलल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:41 IST2026-03-25T13:39:58+5:302026-03-25T13:41:06+5:30
एका स्थानिक वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

...म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला: दिगंबर कामत; विरोधी पक्षनेतेपदी डावलल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'काँग्रेसने माझी किंमत केली नाही. माजी मुख्यमंत्री असूनही मला विरोधी पक्षनेतेपदापासून डावलले आणि शेवटी सर्व पक्ष सोडून गेल्यावर अवघेच काही आमदार राहिले तेव्हा हे पद दिले. ज्या पक्षात किंमत नाही, त्या पक्षात रहावेच का? या विचाराने मी पक्ष सोडला' असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी केले.
एका स्थानिक वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कामत म्हणाले की, २००७ पासून पाच वर्षे मी स्थिर सरकार दिले. मंत्रिमंडळात तेव्हा एकापेक्षा एक वजनदार नेते होते. त्यांना सांभाळून घेत स्थैर्य दिले तरी नंतर माझी किंमत केली नाही. मला नंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही पुढे आणले नाही.'
राजकारणात कसे पाऊल टाकले? या प्रश्नावर दिगंबर कामत म्हणाले की, 'कृषी विपणन मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा राजकारणात आलो. माझ्या घरातील किंवा सासरच्या मंडळीला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माझे वडील त्यावेळी नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यामुळे कृषी विपणन मंडळाकडे संबंध यायचा. मी वडिलांकडे मंडळाची निवडणूक लढवण्याच इच्छा व्यक्त केली. त्यांनी संमतीही दिली. त्यावेळी शशिकला काकोडकर यांचे मगोपचे सरकार सत्तेत होते. मी माझे पॅनल घातले व १३ पैकी आमचे १२ उमेदवार निवडून आले. सत्ताधारी पक्षाला हा मोठा धक्काच होता. त्यानंतर मी तीन कार्यकाळ मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी राज्यभर फिरल्याने ओळखी, संपर्क वाढला. म्हापसा सबयार्ड माझ्याच कार्यकाळात झाले.'
कामत म्हणाले की, '१९७९ साली माझे लग्न झाले. त्यानंतर मी कृषी विपणन मंडळाच्या निवडणुकीतून राजकारणात आलो. पत्नीचे पाऊल माझ्यासाठी लकी ठरले. त्यानंतर मी राजकारणात मागे वळून पाहिले नाही.
'थट्टा करणाऱ्यांची पर्वा नाही'
'देवाचो मनीस' असे संबोधून काहीजण थट्टा करतात, त्याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, 'मला त्याची पर्वा नाही. माझी देवावर अटळ श्रद्धा आहे. लहानपणी आईकडून हे संस्कार झाले. प्रसाद पाकळी घेतल्याशिवाय मी कोणतेच काम करत नाही. माझी थट्टा करणाऱ्याच्या तोंडून देवाचे नाव येते हेसुध्दा माझ्यासाठी खूप झाले.'
'क्षुल्लक कामांना आमदार, मंत्र्यांच्या दारावर यावे लागू नये'
कामत एका प्रश्नावर म्हणाले की, लोकांना क्षुल्लक कामांसाठी आमदार, मंत्र्यांच्या दारावर यावे लागू नये. माझे तर असे म्हणणे आहे की, ज्या दिवशी लोक आमदाराच्या दारी येण्याचे कमी होतील, तेव्हाच सुशासन आले असे मानायला हरकत नाही,' असेही कामत म्हणाले.