आदिवासी भवन होऊ नये यासाठी काहींचे प्रयत्न, त्यांना शोधून काढेन; गोविंद गावडे यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:52 IST2025-06-28T13:52:04+5:302025-06-28T13:52:20+5:30

मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाच नाही.

some people are trying to prevent the construction of adivasi bhavan in goa and i will find them said govind gawade | आदिवासी भवन होऊ नये यासाठी काहींचे प्रयत्न, त्यांना शोधून काढेन; गोविंद गावडे यांचा इशारा 

आदिवासी भवन होऊ नये यासाठी काहींचे प्रयत्न, त्यांना शोधून काढेन; गोविंद गावडे यांचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आदिवासी भवन होऊ नये यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत. त्यांना शोधून काढून उघडे पाडणार आहे, असे विधान आमदार गोविंद गावडे यांनी केले. शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गावडे म्हणाले की, आदिवासी भवनच्या प्रश्नावर मी खुल्या व्यासपीठावर चर्चेला तयार आहे. जमीन जवळजवळ आमच्या हातून गेली होती. ती ताब्यात आणण्यासाठी मी मंत्री असताना प्रयत्न केले. त्रुटी असत्या तर म्युटेशन कसे झाले? याबाबतीत दिशाभूल चालू आहे. काहीजणांना हे भवन झालेलेच नकोय. त्यांचा समाचार मी घेणारच आहे.

आदिवासी कल्याण खात्यात फाइल्सबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मी अजूनही ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, असे मी कुठेही म्हटलेले नाही किंवा मुख्यमंत्र्यांचे नावही घेतलेले नाही. मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी माहिती नव्हत्या. ज्यांनी कारवाई केली त्यांनीच मान्य केले की मी म्हटलेय ते खरे. माझ्या विधानाबद्दल चौकशी करुन कारवाई करायला हवी होती. प्रेरणादिनी सभेला जे होते त्यांच्याशी बोलून मी नेमके कोणते विधान केले हे जाणून घ्यायला हवे होते. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी भ्रष्टाचारावर बोललो. मात्र, ते मुख्यमंत्र्यांबद्दल अजिबात नव्हते, असेही गावडे म्हणाले.

माझ्या भाषणातून अर्थाचा अनर्थ केला. मी संघर्षातून व चळवळीतून आलोय. आदिवासी कल्याण खाते स्थापन झाले, पण २०१२ ते आजतागायत काहीच झाले नाही. २०११ च्या आदिवासींच्या आंदोलनास भाजपने पाठिंबा दिला होता. मी गेल्या वर्षी प्रेरणादिनीही हेच बोलला होतो, परंतु कोणी आक्षेप घेतला नाही. आदिवासी कल्याण खात्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे मी विषय मांडला होता. गेली दोन वर्षे मी हेच सांगत आलो आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी करायला हवी होती. परंतु प्रशासनावर नियंत्रण नाही, असेच म्हणावे लागेल.

भाजपने तिकीट दिले नाही तर?

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने जर तिकीट दिली नाही तर काय करणार? असा प्रश्न केला असता गावडे म्हणाले की, लोक माझ्यासोबत आहेत. मी पैशांच्या बंडलांनी नव्हे तर लोकांची दुःखे पुसून मनाने, काळजाने लोक जोडलेले आहेत. प्रियोळमध्येच नव्हे तर पेडणेपासून काणकोणपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे.

पक्षासोबतच असेन...

मंत्रिपद काढले तरी तुम्ही अजूनही मनाने पक्षासोबत आहात काय? या प्रश्नावर गावडे म्हणाले की, मी पक्षासोबतच आहे. पक्षातील दोन-चार लोकांना माझी अॅलर्जी आहे म्हणून मी लोकांचा घात करू शकत नाही. काही विरोधकांचेही मला फोन आले की भाजपचेच एक दोघेजण त्यांना माझ्याविरोधात मसाला पुरवत आहेत. पक्षात थिंक टैंक म्हणून ओळखले जाणारे पदाधिकारीच हे कर्म करीत आहेत, असे गावडे म्हणाले. बिरसा मुंडा रॅलीवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले त्यावर तुम्ही आवाज उठवला. कारण सभापती रमेश तवडकर यानी रॅलीचे नेतृत्व केले होते. तुमचे टार्गेट तवडकर हे होते का? असा प्रश्न केला असता गावडे म्हणाले की, तवडकर माझे मित्र. एका ताटात आम्ही जेवलोय. मी मंत्री असूनही रॅलीबद्दल मला नंतर समजले. मला अंधारात ठेवले. अजूनही माझा प्रश्न आहे की एवढा खर्च करुन या रॅलीतून काय साध्य केले?

आदिवासी खाते माझ्याकडे हवे होते

तवडकरांचे प्रत्यक्ष नाव न घेता गावडे म्हणाले की, उटाच्या व्दिशतकपूर्ती रॅलीत या लोकांची गैरहजेरी का? उटातून कोणी गेले म्हणून संघटना बंद पडणार नाही. ती एक चळवळ आहे. एसटी नेते असूनही तुम्हाला २०२२ च्या निवडणुकीनंतर आदिवासी खाते का दिले नाही?, असा प्रश्न केला असता गावडे म्हणाले की, मी कधीच कोणतेच खाते मागितले नाही. माझ्याकडे खाते असते तर मी सर्व प्रश्न मार्गी लावले असते. एसटींना अंत्यसंसकार योजनेचा लाभही अधिकारी देऊ शकत नाहीत. प्रशासनाचे नियंत्रणच नाही.
 

Web Title: some people are trying to prevent the construction of adivasi bhavan in goa and i will find them said govind gawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.