ड्रग्ज मुक्त गोव्यासाठी एसआयओची पणजीत रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:03 IST2023-12-20T18:03:03+5:302023-12-20T18:03:33+5:30
या मोहिमेचा समारोप आज २० डिसेंबर रोजी कला अकादमी येथून विद्यार्थ्यांच्या रॅलीने झाला.

ड्रग्ज मुक्त गोव्यासाठी एसआयओची पणजीत रॅली
- नारायण गावस
पणजी: ड्रग्जमुक्त राज्य म्हणून गोव्याची ओळख प्रस्थापित करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी समर्पित प्रयत्न करावेत, अशी मागणी स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) च्या गोवा विभागाच्या वतीने करण्यात आली. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढणे हा मोठा धोका आहे. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना ड्रग्ज सहज उपलब्ध होणे हा सर्वात मोठा धोका आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसआयओने १० ते २० डिसेंबर दरम्यान
'डी ॲडिक्टिंग गोवा २.०' या थीमवर १० दिवसांची मोहीम आयोजित केली होती.
या मोहिमेचा समारोप आज २० डिसेंबर रोजी कला अकादमी येथून विद्यार्थ्यांच्या रॅलीने झाला. एसआयओचे गोवा प्रदेशाध्यक्ष उस्मान खान म्हणाले, गोव्याची भविष्यातील वाटचाल केवळ तरुणच बदलू शकतात. विद्यार्थ्यांनी गोव्यातील शैक्षणिक संस्था आणि राज्यातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याची शपथ घेतली पाहिजे.
अंमली पदार्थ मुक्त गोव्याची संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी एसआयओने दहा दिवसात अनेक उपक्रम राबवले. यादरम्यान त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कॅम्पस व्याख्याने आयोजित केली.त्यांनी ७ शहरांमधील २० हून अधिक ठिकाणी मूक नात्ये सादर केली.शिवाय रॅली काढली.राज्यभरातील १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला, पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटी, घरोघरी भेटी आणि कुटुंबांसोबत कॉर्नर मीटिंग, अमली पदार्थांच्या, व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबद्दल जनतेला जागरुक केले. या मोहिमेचा समारोप राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेने झाला ज्यामध्ये पणजी येथे ६० हून अधिक विद्यार्थी पात्र झाले आणि त्यांनी भाग घेतला.
'एसआयओ ' ने केलेल्या मागण्या
गोव्यातील ड्रग हॉटस्पॉट ओळखणे आणि बंद करणे, सुट्टीच्या वेळेत तसेच दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत पोलिस व्हॅनने शाळा परिसरात गस्त घालावी,
नागरी समाज आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येऊन सहाय्यक गट तयार करावे ,जे व्यसनाधीनांना सेवा देऊ शकतील आणि त्यांना पुनर्वसन प्रक्रियेत मदत करू शकतील. एसआयओ गोवाचा विश्वास आहे की प्रत्येकाच्या सहकार्याने गोव्यातील शैक्षणिक क्षेत्र आणि सर्वसाधारणपणे राज्यातून अंमली पदार्थांचे संकट दूर केले जाऊ शकते.