पर्यटकांच्या अभावामुळे शॅक व्यवसाय ठप्प; पर्यटकांची संख्या घटल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:32 IST2026-04-29T13:31:32+5:302026-04-29T13:32:14+5:30
तिवायवाडा परिसरातील सर्व १८ शॅक सुमारे १५ दिवसांपूर्वी हटवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यटकांच्या अभावामुळे शॅक व्यवसाय ठप्प; पर्यटकांची संख्या घटल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: पर्यटकांच्या अभावामुळे कळंगुट किनारी भागातील अनेक शॅक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय गुंडाळल्याचा दावा शॅक संघटनेचे पदाधिकारी मॅन्युएल कार्दोज यांनी केला आहे. तिवायवाडा परिसरातील सर्व १८ शॅक सुमारे १५ दिवसांपूर्वी हटवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
व्यवसायच नसल्याने शॅक बंद करण्याची वेळ आल्याचे कार्दोज यांनी स्पष्ट केले. म्हाड्डावाडो तसेच इतर भागांतीलही अनेक शॅक काढण्यात आले असून, सध्या फक्त किनाऱ्यावर प्रवेशद्वाराजवळील काही शॅक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी सरकारने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर या क्षेत्राचे भवितव्य अधांतरी राहील, अशी भीतीही त्यांनी दिला.
शॅक व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी परदेशी पर्यटकांचे आगमन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, व्हिजा प्रक्रियेमधील अडचणी आणि वाढलेले शुल्क यामुळे पर्यटक भारतात येण्यास टाळाटाळ करत असून, स्वस्त किंवा मोफत व्हिजा सुविधा असलेल्या इतर देशांकडे वळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्यास स्थानिकही काही प्रमाणात जबाबदार असल्याचा आरोप सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी केला. स्थानिकांनी आपले व्यवसाय इतरांच्या ताब्यात दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे त्यांनी नमूद केले.
शॅकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देणेही कठीण झाले असून, गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे कार्दोज यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत व्यवसाय सुरू ठेवण्यात कोणताही फायदा नसल्याचे त्यांनी सांगितले.