आरजीसोबत युतीस तयार: आप आमदार वेंझी व्हिएगश; मनोज परब यांच्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:33 IST2026-02-28T12:32:30+5:302026-02-28T12:33:23+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात संभाव्य युतीची चर्चा पुन्हा रंगली आहे.

आरजीसोबत युतीस तयार: आप आमदार वेंझी व्हिएगश; मनोज परब यांच्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'राज्याच्या व्यापक हितासाठी रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षा (आरजी) सोबत बिनशर्त युती करण्यास आम आदमी पक्ष तयार आहे,' असे आपचे आमदार वेंझी व्हिएगास यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पक्षाच्या येथील कार्यालयात त्यांनी आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी युतीसाठी दिलेल्या प्रस्ताबाबत आपची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात संभाव्य युतीची चर्चा पुन्हा रंगली आहे.
आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, 'परब यांनी हा प्रस्ताव दिला आहे. लोकहित सर्वात महत्त्वाचे असल्याने आप युतीसाठी खुला आहे. युतीमुळे गोव्याच्या जनतेला फायदा होत असेल तर पक्ष सकारात्मक विचार करील.' 'आप' आणि 'आरजीपी' यांच्यातील संभाव्य युतीमुळे गोव्यातील राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या मुद्यांवर हवी चर्चा
व्हिएगश यांनी युतीसाठी तयारी दर्शवली असली तरी यासंबंधी कोणतीही अधिकृत संयुक्त घोषणा झालेली नाही. युती करावयाची झाली तर जागावाटप, समान कार्यक्रम, नेतृत्व या मुद्द्यांवर चर्चा व्हावी लागेल. दोन्ही पक्षांच्या कार्यकारिणीची अंतिम मंजुरी आवश्यक राहणार आहे. विधानसभेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असून यापूर्वी याबाबत अंतिम निर्णय शक्य आहे. भ्रष्टाचार, जमीन, रोजगार, स्थानिक हक्क हे प्रमुख अजेंडा ठरू शकतात. 'आप' आणि 'आरजीपी' यांच्यातील संभाव्य युतीमुळे गोव्यातील राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
इतर पक्षांशीही चर्चा
आमदार व्हिएगस म्हणाले की, आरजी सोबतच इतर विरोधी पक्षांशीही संवाद साधून योग्य कार्यक्रम आखण्याचा आपचा प्रयत्न राहील. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत सशक्त व प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांनाही विरोधक एकत्र आलेले हवे आहेत. राज्याच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत चर्चा करून टप्प्याटप्प्याने पुढील निर्णय घेतले जातील. आघाडी कोणत्याही अटींशिवाय, केवळ राज्याच्या हिताला प्राधान्य देऊन असावी, असे त्यांनी नमूद केले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल.
आंदोलनादरम्यान झाली एकी
'टीसीपी'च्या 'कलम ३९ अ' विरोधातील महाआंदोलनात आरजी व आपचे नेते गेले काही दिवस एकत्र वावरत होते. वेंझी तसेच आमदार कुझ सिल्वा, आपचे गोवा प्रमुख वाल्मीकी नायक आंदोलनात आरजीच्या नेत्यांसोबत सक्रिय दिसत होते. या पार्श्वभूमीवरच मनोज यांनी आम आदमी पक्षाला हा प्रस्ताव दिल्याचे मानले जाते.