'राजभवन अन्नदाता योजने'चा प्रारंभ; राज्यपाल पिल्लई यांनी पुस्तकांच्या स्वामित्वधनातून दिला निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:22 IST2025-06-30T14:21:29+5:302025-06-30T14:22:32+5:30

डायालिसीस, कर्करोग रुग्णांना आर्थिक मदत

raj bhavan annadata yojana launched in goa | 'राजभवन अन्नदाता योजने'चा प्रारंभ; राज्यपाल पिल्लई यांनी पुस्तकांच्या स्वामित्वधनातून दिला निधी

'राजभवन अन्नदाता योजने'चा प्रारंभ; राज्यपाल पिल्लई यांनी पुस्तकांच्या स्वामित्वधनातून दिला निधी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 'राजभवन अन्नदाता योजने'चा शुभारंभ रविवारी झाला. राज्यपालांनी आपल्या पुस्तकांच्या स्वामित्वधनातून या योजनेसाठी निधी दिला असून त्याबद्दल केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे कौतुक केले.

राज्यपाल पिल्लई यांनी सुमारे २६० पुस्तके लिहिली असून त्यांच्या काही पुस्तकांचा अनुवादही झाला आहे. या माध्यमातून मिळणारे स्वामीत्वधन त्यांनी वरील योजनेसाठी दिले आहे. राजभवनवर नवीन दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्ट्रीट प्रोव्हिडन्सचे विश्वस्त डोनाल्ड फर्नाडिस यांना १ लाख २० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. डायालिसीस व कर्करोग रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसाहाय्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले की, एखाद्या योजनेसाठी स्वतःच्या पुस्तकातून मिळणारी रॉयल्टी निधी म्हणून देणारे पिल्लई हे पहिले राज्यपाल असावेत. त्यांनी लोककल्याणाचा विडा उचलला आहे. गोव्याचे राजभवन हे लोकभवन झालेले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यपालांचे कौतुक केले. ते म्हणाले की, पिल्लई यांनी गोव्यातील मंदिरे, येथील गाव, वृक्षांबद्दलही लिहिले आहे. ही पुस्तके महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये अभ्यासात संदर्भ पुस्तके म्हणून उपयोगी ठरतील.

प्रत्येक तालुक्यात डायलिसिसची सोय

डायलिसिस तसेच कर्करोग रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अर्थसाहाय्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, डायलिसिसचे रुग्ण वाढतायेत त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. आहार तसेच इतर गोष्टींवर लक्ष ठेवून पथ्य पाळायला हवे. कर्करोग टाळण्यासाठी दिनचर्या व ऋतुचर्या पाळावी, त्यामुळे प्रमाण वाढणार नाही. सरकारने डायलिसिसची सर्व तालुक्यांमध्ये सोय केलेली आहे. स्ट्रीट प्रॉव्हिडन्स सारख्या संस्थेला सरकारने पैसे दिले. इतर एनजीओंनीही असेच काम करून केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवावा.

'त्या' मुलींना सामावून घ्या

आर्लेकर यांनी पुढे असे सुचवले की, कर्करोग रुग्णांना अर्थसाहाय्याच्या बाबतीत राज्य सरकारने नऊ ते चौदा वर्षापर्यंतच्या मुली, ज्यांना सर्वायकल कॅन्सर झालेला आहे, त्यांनाही सामावून घ्यावे. अशा मुलींना दोन लसी घ्याव्या लागतात. त्या महागड्या आहेत. त्याची सोय सरकारने करावी.

१००८ बोन्साय झाडे लावली

मुख्यमंत्री म्हणाले की, पिल्लई गोव्यातील प्रत्येक गाव फिरले. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या समन्वय असल्यावर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. राज्यपाल गावात गावात फिरतात तेव्हा त्यांना काही समस्या किंवा त्रुटी आढळून आल्या तर ते पत्र लिहून मला कळवतात व अंत्योदय तत्त्वावर चालणारे माझे सरकार या समस्या दूर करण्याचे प्रयत्न करते. गेल्या चार वर्षांच्या काळात पिल्लई यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राजभवनच्या आवारात आचार्य चरक व आचार्य सुश्रुत यांचे बसवलेले पुतळे आकर्षण बनले आहेत. तसेच राजभवन आवारात १००८ बोन्साय (वामनवृक्ष) झाडे लावली हे कौतुकास्पद आहे.

Web Title: raj bhavan annadata yojana launched in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.