मंत्र्याच्या घरावर धडकला मोर्चा; दोनापावला येथे सर्वपक्षीय विरोधी आमदारांसह लोकांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:04 IST2026-02-24T14:03:02+5:302026-02-24T14:04:47+5:30
नगरनियोजन कायद्यातील ३९ (ए) विरोधात हजारोंचा जनसमुदाय उतरला रस्त्यावर, संतप्त आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट; बॅरिकेड्स पाडून आंदोलक धावले.

मंत्र्याच्या घरावर धडकला मोर्चा; दोनापावला येथे सर्वपक्षीय विरोधी आमदारांसह लोकांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नगरनियोजन कायद्याचे कलम ३९ (ए) रद्द करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार वीरेश बोरकर यांच्या आंदोलनाने काल आक्रमक रूप धारण केले. सरकारवर दबाव आणण्यासाठी काल पणजीत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राज्यभरातून लोक आझाद मैदानावर जमले.
सायंकाळी ४.३० च्या सुमारास आंदोलकांनी टीसीपी मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना जागेजागी अडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, मिळेल त्या रस्त्याने प्रसंगी मिरामार किनाऱ्यावरून आंदोलक धावत दोनापावलाच्या दिशेने सुटले. रात्रभर आंदोलक मंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसले.
नगरनियोजन कायद्याच्या कलम ३९ ए विरोधात आंदोलन करताना पणजी पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाविरोधातही सरकारने अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. संबंधित पोलिसांना सेवेतून त्वरित निलंबित करावे, अशीही मागणीही आंदोलकांनी केली असून या आंदोलनाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
वीरेश बोरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवकही बेमुदत उपोषणात सहभागी झाले आहेत. आंदोलनाला पाळे-शिरदोण येथील ग्रामस्थांप्रमाणेच राज्यभरातील विविध भागांतून लोक पाठिंबा देण्यासाठी सध्या आझाद मैदानावर येत आहेत. या शिवाय काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी, आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही वीरेश यांच्यासोबत आहेत. या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
मिरामार किनाऱ्यावरून दोनापावला येथे धावत सुटले
कलम ३९ (ए) विरोधात आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी मिरामार येथे अडवताच त्यांनी मिरामार किनाऱ्यावर धाव घेत तिथून दोनापावला गाठले. त्यानंतर पोलिसांनी हा मोर्चा दोनापावला सर्कल येथे पुन्हा अडवला. तर अन्य आंदोलकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून मंत्री राणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे मंत्र्यांच्या घरावरील मोर्चा अडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न एकप्रकारे फसला.
वीरेश, तुषारची आरोग्य तपासणी
कलम ३२ ए विरोधात बेमुदत उपोषणास बसलेल्या आमदार वीरेश बोरकर तसेच तुषार गावस या युवकाची १०८ रुग्णवाहिकेतील कर्मचारी येऊन तपासणी करीत आहेत. त्यांना मध्यंतरी अन्न, पाणी घेण्यासही सांगितले होते. मात्र त्यांनी नकार दिला. काल रात्री उशिरा पुन्हा वीरेश यांची प्रकृती खालावल्याने डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी वीरेश यांची तपासणी केली.
सरकारची गुंडशाही : आलेमाव
आझाद मैदानावरील महाआंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कुंकळ्ळीतील नागरिकांना पोलिसांनी अडविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानावर येतील, या भीतीने भाजप सरकारने पोलिस बळाचा वापर करत लोकांना पणजीकडे जाण्यापासून रोखले. कलम ३९-अ विरोधात आवाज उठवणाऱ्या जनतेला रोखणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. सरकारची ही गुंडशाही असून आम्ही त्याविरुद्ध लढा देऊ, असेही आलेमाव म्हणाले.
आंदोलक पुन्हा आझाद मैदानावर
नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील निवासस्थानाबाहेर ठिय्या देऊन बसलेले आंदोलक मध्यरात्री पुन्हा आझाद मैदानावर गेले. वीरेश बोरकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. ही बातमी समजताच आंदोलक पुन्हा आझाद मैदानावर गेले. आंदोलनाची जागा बदलली आहे, मात्र लढा नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी बोरकर यांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
आता आरपारची लढाई : वीरेश बोरकर
वीरेश बोरकर म्हणाले, की गोव्यासाठी घातक अशा कलम ३९ ए विरोधात सुरू केलेल्या आंदोलनातून आता कुठल्याही स्थितीत आम्ही माघार घेणार नाही. सरकारला हे कलम रद्दच करावे लागणार. आता आरपारची भूमिका घेऊन आम्ही लढा देत आहोत. या आंदोलनात लोकांनी देखील मोठ्या संख्येने भाग घेऊन सरकारला त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. आम्ही आमच्या जमिनी दिल्लीवाल्यांच्या घशात घालू देणार नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधी आमदारही चालत दोनपावलावर
मंत्र्यांच्या घरावर काढण्यात आलेल्या मोर्चात विरोधी आमदार सहभागी झाले होते. सकाळपासून आझाद मैदानावर उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा यांनी पायी चालत दोनापावला गाठले. सुरुवातीला पोलिसांनी कला अकादमी व नंतर मिरामार सर्कल परिसरात बॅरिकेड घालून मोर्चा अडवला. परंतु, मार्ग काढत आंदोलक पुढे गेले.
पोलिसांनी १२ तास केली विनवणी
टीसीपी कार्यालयात निवेदन सादर केल्यानंतर तिथे दिवसरात्र ठिय्या मांडण्याची गरज नव्हती. कार्यालयातील फाइल्स वगैरे गहाळ झाल्यास कोण जबाबदार होते? आंदोलकांनी घरी जावे यासाठी पोलिसांनी तब्बल १२ तास विनवणी केली. परंतु कोणीही ऐकले नाही. वीरेश यांनी तर मामलेदार व पोलिसांकडे आपल्याला उचलून न्या, अशी उद्धट भाषा केली. त्यानंतरच कारवाई झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कायदा हातात घेऊ नका; चर्चेला या : मुख्यमंत्री
टीसीपीचे कलम ३९ अ रद्द करण्याच्या मागणीसाठी मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील खासगी बंगल्यावर मोर्चा नेलेल्या आंदोलकांना कायदा हातात घेऊ नका, योग्य व्यासपीठावर चर्चेला या, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. आंदोलकांना मर्यादा सांभाळून योग्य पद्धतीने आंदोलन करण्यास कोणाचीही हरकत नाही. परंतु मंत्र्याच्या खासगी निवासस्थानावर मोर्चा नेऊन सर्वांना वेठीस धरणे योग्य नव्हे. ज्या काही मागण्या असतील त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शांतपणे आंदोलन करता आले असते. आमदार वीरेश बोरकर यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सहकारी आमदार, मंत्र्याच्या घरावर मोर्चा नेणे शोभत नाही. वीरेश यांनी हवे तर माझ्याकडे चर्चेला यायला हवे होते. दोन दिवसांपूर्वी वीरेश यांनी मला फोन केला होता तेव्हा मी त्यांना काय ते सांगितले होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आंदोलनातील ठळक मुद्दे
आंदोलनात सहभागी होण्यासाठी दक्षिण गोव्यात येणाऱ्या तब्बल ११ बसेस पोलिसांनी अडवल्या.
विरोधी पक्षनेते व विरोधी आमदार आझाद मैदान ते दोनापावला चालत गेले.
मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्याबाहेर काँग्रेस, आप आमदारांचा ठिय्या
मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी. दोनापावला ते पणजीला जाणारे रस्ते आंदोलकांनी अडवले.
रुग्णवाहिकाही आंदोलकांनी अडवली. रस्ते अडवल्याने पर्यटकांचे प्रचंड हाल.
मिरामार येथे मोर्चा अडवताच, आंदोलकांनी किनाऱ्यावरून गाठले दोनापावला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस तैनात. आंदोलकांनी पोलिसांचीही अडवली बस.