पणजी स्मार्ट करताना महापौर-उपमहापौरांना डावलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 20:02 IST2017-12-23T20:02:38+5:302017-12-23T20:02:42+5:30
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजी शहराचा समावेश झाला. त्यानुसार या शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू झाली आणि काही कामांचा शुभारंभही धडाक्यात होत आहे.

पणजी स्मार्ट करताना महापौर-उपमहापौरांना डावलले?
पणजी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजी शहराचा समावेश झाला. त्यानुसार या शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू झाली आणि काही कामांचा शुभारंभही धडाक्यात होत आहे. पण हे सर्व कार्यक्रम या शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर सुरेद्र फुर्तादो यांना वगळून केले जात असल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे. तसेच मॉन्सेरात गटातील नगरसेवकांविषयीही याबाबत चर्चा आहे.
केंद्राच्या स्मार्ट सिटीअंतर्गत मिळालेल्या निधीतून पणजी शहरात विविध विकास कामांना आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) माध्यमातून सुरुवात झाली आहे. मळ्यातील खाडीवरील पुलाचे उद्घाटन असो किंवा आल्तिनो येथील मोकळ्य़ा जागेच्या सुशोभिकरणाच्या कामाच्या कोनशिलेचे अनावरण असो, हे सर्व कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हायजॅक केलेत की काय, असे वाटू लागले आहे. शहरातील विकास कामांच्या शुभारंभाला प्रथम नागरिक म्हणून महापौरांनाच डावलण्यात येत असल्याने येथे राजकारणाचा वास येत आहे. त्याचबरोबर उपमहापौर लता पारेख यांनाही पूर्णपणो वगळले गेले आहे.
महानगरपालिकेत बाबूश मॉन्सेरात यांची सत्ता आहे आणि मॉन्सेरात यांच्याच गटाचे फुर्तादो हे महापौर आहेत. सरकारमध्ये घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये मॉन्सेरात गेले असले तरी भाजपाकडून फुर्तादो यांना डावलले जात आहे. या विकासकामांचे सगळे श्रेय पर्रीकरांकडून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना देण्याचा प्रयत्न होत आहे.
निमंत्रणाचे काहीच वाटत नाही : फुर्तादो
स्मार्ट सिटीच्या कामाची आपण काळजी करीत नाही. त्याचबरोबर जो कोणी कामे करीत आहेत, त्यांनी ती करावीत. विकास कामाच्या शुभारंभास प्रथम नागरिक म्हणून मला निमंत्रण दिले नाही आणि त्याचे आपणास काहीच वाटत नाही. परदेशातून लोक आपणास भेटण्यास येतात, त्यात आपण समाधानी आहे. - सुरेंद्र फुर्तादो, महापौर.