विरोधक पुन्हा एकवटले; विधानसभा अधिवेशनासाठी बैठकीत रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:43 IST2026-02-11T11:40:33+5:302026-02-11T11:43:05+5:30
सातही विरोधी आमदारांनी व्यक्त केला निर्धार.

विरोधक पुन्हा एकवटले; विधानसभा अधिवेशनासाठी बैठकीत रणनीती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या ६ मार्चपासून सुरू होणार असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विविध प्रश्नांवरून घेरण्यासाठी संयुक्त विरोधकांनी काल, मंगळवारी बैठकीत रणनीती आखली. अधिवेशनाचा प्रत्यक्ष कालावधी केवळ १४ दिवसांचाच ठेवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली असून कामकाजाचे दिवस वाढवण्याची मागणी करण्यासाठी सभापतींना पत्र लिहून राज्यपालांचीही भेट घेतली जाणार आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथे झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे तिन्ही आमदार तसेच आपचे आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा तसेच गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि आरजीचे वीरेश बोरकर हे सातही विरोधी आमदार उपस्थित होते. युरी म्हणाले की आम्ही सर्व विरोधी आमदार अधिवेशनात पर्यावरण विनाश, चोऱ्या व दरोडे, खून, बेकारी, म्हादई तसेच अन्य प्रश्नांवर जाब विचारू, फर्दिने रिबेलोंनी मागण्यांचे निवेदन आम्हाला पाठवले आहे. गोव्याच्या हिताचे मुद्दे आम्ही सभागृहात मांडू. त्यासाठी सभापतींनी संधी द्यावी. कामकाजाचे दिवस वाढवावे यासाठी सभापतीना पत्र लिहिणार आहोत तसेच राज्यपालांना भेटणार आहोत'.
मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. तसेच अकरा मंत्री आहेत. या खात्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आम्हाला वेळ मिळायला हवा. बजेटच्या दिवशी खाजगी ठराव कामकाजात घेणार आहेत की नाही? हा प्रश्न आहे. आपचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, 'एरव्ही राजकीय मतभेद असले तरी विधानसभा अधिवेशनात मात्र आम्ही सर्व विरोधक एकत्र आहोत आणि विविध प्रश्नांवर सरकारला घेरणार आहोत.'
कामकाजाचे दिवस घटवले...
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना युरी म्हणाले की, 'कामकाजाचे दिवस कमी केल्याबद्दल आम्ही निषेध करतो. विधानसभा कामगाज सल्लागार समितीच्या गेल्या बैठकीत २५ दिवस प्रत्यक्ष कामकाज घेतले जाईल, असे सांगितले होते. परंतु त्याला पाने पुसली गेली. सरकार विरोधकांना घाबरत आहे.
फोंडा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही, हा प्रश्न आहे. हे सरकार एकेक चुकीचा पायंडा पाडत आहे. खाजगी कामकाजाच्या दिवशी बजेट सादर करण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे. सरकार फोंडा पोटनिवडणुकीमध्ये व्यस्त आहे. सरकार तुमच्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी पैशांनी निवडणूक प्रचार चालू आहे. - विजय सरदेसाई, आमदार
आम्हाला गोमंतकीयांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी संधी मिळायला हवी. कामकाजाचे दिवस कमी करून अन्याय केला जात आहे. या प्रश्नावर आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत. - वीरेश बोरकर, आमदार