कितीही खटले घातले तरी घरे लोकांच्या नावावर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:14 IST2026-02-25T13:13:43+5:302026-02-25T13:14:47+5:30
गृहआधार योजनेचे पैसे आता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला जमा होणार

कितीही खटले घातले तरी घरे लोकांच्या नावावर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: गोव्यातील लोकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने 'माझे घर' ही योजना राबवली आहे. त्याचा लाभही घेतला जात आहे. मात्र, काहीजणांनी लाभार्थ्यांवर खटलेही घातले आहेत. परंतु, 'भिवपाची गरज ना' असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्या खटल्यांचे काय करायचे ते मी पाहून घेईन. कोणी कितीही खटले घातले तरी घरे नावावर होतील, हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरामध्ये महिला व बालकल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गृहआधार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, पंचायत संचालक महादेव आरोंदेकर, महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालक ज्योती देसाई, कुर्टीचे सरपंच नावेद तहसीलदार, शिरोडा जि. पं. सदस्य डॉ. गौरी शिरोडकर, नगरसेवक आनंद नाईक, दीपा कोलवेकर, अपूर्व दळवी इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम करत असलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या ३० तारखेला ज्या प्रमाणे वेतन दिले जाते त्याचप्रमाणे यापुढेही गृहआधार योजनेचा लाभ घेत असलेल्या राज्यातील एक लाख ८० हजार महिलांना महिन्याच्या १० तारखेला योजनेची रक्कम दिली जाणार आहे.
मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार ही योजना राबवली. पूर्वी गृहआधार योजनेचा आकडा एक लाख तीस हजार एवढा होता तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा आकडा आता एक लाख ८० हजारांवर गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळत असलेल्या सहकार्यामुळेच आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांपर्यंत ही योजना पोहचवू शकलो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी कार्यक्रमात नावेद तहसीलदार यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमात स्वागत ज्योती देसाई यांनी केली.
मंत्री सुभाष शिरोडकर गृहआधार योजनेच्या अंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात, तरीही ज्या व्यक्तीकडे पैसे नाहीत अशा महिलांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे. सरकारी अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे ६०० कोटी रुपये खर्च करून वेतन दिले जाते त्याचप्रमाणे अतिरिक्त पन्नास कोटी रुपये देऊन महिलांना, वेळेवर गृहआधार योजना उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे, असे शिरोडकर म्हणाले.
सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी दीनदयाळ, अटल पेन्शन, स्पेशल पेन्शन अशा विविध योजनांच्या अंतर्गत चार लाखांहून अधिक लोकांना अर्थसाहाय्य केले जाते. हे आपण केवळ लोकांचे जीवन आनंदी बनवण्यासाठी व लोकांची काळजी असल्यामुळे करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकार एवढ्या योजना राबवत असताना जनतेनेही आपल्या कर्तव्याची जाण ठेवत गोवा सुंदर व स्वच्छ बनवण्यासाठी सहकार्य करावे. सरकार लाखो रुपये कचऱ्यावर खर्च करत असते. त्यामुळे नागरिकांनीही गोवा स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सावंत यांनी केले.