गोव्याची आध्यात्मिक ओळख जपण्याची गरज: अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 07:19 IST2026-04-01T07:17:19+5:302026-04-01T07:19:27+5:30
तपोभूमीला भेट देऊन गोवा दौऱ्याची सुरुवात

गोव्याची आध्यात्मिक ओळख जपण्याची गरज: अरविंद केजरीवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्याला सखोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, जी त्याच्या सध्याच्या प्रतिमेपलीकडे जपली आणि प्रोत्साहित केली गेली पाहिजे, असे मत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांनी तपोभूमी श्री दत्त पद्मनाभ पीठ येथे भेट देऊन ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे दर्शन घेतले. या भेटीद्वारे केजरीवाल यांच्या तीन दिवसीय गोवा दौऱ्याची सुरुवात झाली.
यावेळी गोवा प्रभारी आतिषी मार्लेना, राज्य संयोजक वाल्मीकी नायक, फोंडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गीतेश नाईक, संघटन सचिव प्रशांत नाईक, वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी आप नेत्यांमध्ये आध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. गोव्याला आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
अलीकडील काळात गोव्याची ओळख ड्रग्स हब आणि पार्टी संस्कृतीशी जोडली जात असली तरी राज्यात खोलवर रुजलेली आध्यात्मिक परंपरा, मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज असल्याचे नेत्यांनी नमूद केले.
केजरीवाल म्हणाले, की गोव्याला पर्यटनाच्या नव्या दृष्टिकोनाची आवश्यकता असून, त्यात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा समावेश असावा. राज्याची प्रतिमा केवळ पार्टी कॅपिटल किंवा ड्रग्स हब अशी न राहता, ती संतुलित आणि मूल्याधारित पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावी.
यावेळी गीतेश नाईक म्हणाले, की फोंडा हा मंदिरनगरी म्हणून ओळखला जात असून, येथूनच गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासाला चालना मिळू शकते. समाजात एकता, उद्देशपूर्ण कार्य आणि निःस्वार्थ सेवाभाव वाढवण्यावर आपचा भर आहे.
यावेळी नायक यांनी गोव्याची ओळख बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली. राज्य केवळ भौतिक सुख देणारे पर्यटनस्थळ न राहता आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच कॅसिनोविरोधातील स्वामीजींच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.