पणजी - म्हादईच्या पात्रातील पाणी कमी झाल्याचा दावा सोलीसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू हरित लवादाकडे बाजू मांडताना केला. त्यामुळे म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविता येणार नाही असे निवेदन त्यांनी लवादापुढे केले. म्हादईच्या पात्रात अतिरिक्त पाणी असल्याचा कर्नाटकचा दावा त्यांनी खोडून काढताना नाडकर्णी यांनी म्हादईतील पाणी घटल्याचे योग्य पुराव्यांचा उल्लेख करताना सांगितले. तसेच मलप्रभेत पाण्याचा तुटवडा असल्याचा कर्नाटकच्या दाव्यालाही हरकत घेतली. मलप्रभातील पाण्याविषयी कोणतेही सर्व्हेक्षण, अभ्यास वगैरे न करता कर्नाटकने हा दावा केला असल्यामुळे त्यात काही तथ्य नाही. कर्नाटकला पिण्यासाठी पाणी नको आहे तर शेती बागायतीसाठी पाणी हवे आहे. त्यासाठी ते म्हादयीचा स्रोत वळवू शकत नाहीत असा दावा त्यांनी केला. नाडकर्णी यांच्यासह गोव्याचे अॅडव्होकेट जनरल, दत्तप्रसाद लवंदे, अॅड संतोष रिबेलो, निकिता नाडकर्णी, अमोघ प्रभुदेसाी, अक्षया जोगळेकर, अरविंदो गोम्स परेरा, आशिष कुंकळ््येकर, अश्वेक गोसावी, मयुरी नायर चावला या वकिलांचे पथक यासाठी लवादापुढे बाजू मांडत आहेत. या प्रकरणात मंगळवारी सुनावणी पुढे चालू राहील.
म्हादईतील पाणी घटले गोव्याचा लवादापुढे दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 9:46 PM