विकसित भारतासाठी कृषी क्षेत्र बळकट करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:26 IST2026-04-03T08:25:40+5:302026-04-03T08:26:21+5:30
केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बैठकीत सहभाग

विकसित भारतासाठी कृषी क्षेत्र बळकट करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'विकसित भारत' या संकल्पनेला गती देण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर राज्य सरकार भर देत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय बैठकीत त्यांनी व्हर्चुअल पद्धतीने सहभाग घेत हा मुद्दा ठामपणे मांडला.
देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कृषी क्षेत्रातील आव्हाने, धोरणात्मक उपाययोजना आणि नवकल्पना यावर सविस्तर चर्चा झाली. गोव्याच्या दृष्टिकोनातून बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली.
दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांबाबतही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती दिली.
तंत्रज्ञानाचा वाढता वापर
अॅग्री-स्टॅक आणि 'शेतकरी आयडी'मुळे शेतकऱ्यांची डिजिटल नोंद तयार होणार आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभथेट आणि अचूक पद्धतीने देणे शक्य होईल. तसेच रिअल-टाइम माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि इतर इनपुट्स देणे, उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आणि उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करणे, यावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
विभागीय परिषदांद्वारे आणि राज्यांमधील समन्वयातून ज्ञानाची देवाणघेवाण व नवकल्पनांना चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. गोव्याच्या भौगोलिक व कृषी वैशिष्ट्यांना अनुरूप सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास या सहकार्याचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतीचे डिजिटलायझेशन
अॅग्री-स्टॅक अंतर्गत 'शेतकरी आयडी'सारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक डिजिटल प्रणाली उभारणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे शासकीय योजनांचा लाभ अधिक अचूकपणे पोहोचवणे, सेवा वितरण सुधारणा आणि शेतकऱ्यांना रिअल-टाइम कृषी साहाय्य मिळणे सुलभहोणार आहे. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते यांसारखे आवश्यक इनपुट्स उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे, यावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' या ध्येयाशी सुसंगत राहून शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरी-केंद्रित कृषी व्यवस्था उभारण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी अधोरेखित केले.