वाढत्या जनआंदोलनांमुळे सरकारचा बचाव कठीण; विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:31 IST2026-03-06T12:30:06+5:302026-03-06T12:31:11+5:30
लोकांकडून दोन हजारांहून अधिक सूचना

वाढत्या जनआंदोलनांमुळे सरकारचा बचाव कठीण; विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात सध्या विविध प्रश्नांवरून सुरू असलेली जनआंदोलने आणि लोकांचा वाढता रोष पाहता, आगामी विधानसभा अधिवेशनात सरकारला आपला बचाव करणे अत्यंत कठीण जाईल, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.
उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. गोव्यातील जनतेकडून आतापर्यंत २,१९३ सूचना आणि समस्या प्राप्त झाल्या आहेत. या लोकभावनेचा विचार करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याची पूर्ण तयारी केली आहे. अधिवेशनासाठी एकूण ४२ तारांकित आणि २१० अतारांकित प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यासोबतच १४ शून्य तासाच्या सूचना, १४ लक्षवेधी सूचना, ४ खासगी सदस्य विधेयके आणि ३ ठराव सादर करून सरकारला विविध विषयांवर उत्तर देण्यास भाग पाडले जाणार आहे. लोकांच्या समस्या मांडण्यासाठी हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत सरदेसाई यांनी दिले आहेत.
गोवा आता पूर्वीसारखा राहिला नाही...
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. राज्यातील जनतेकडून आलेल्या २,००० हून अधिक सूचनांच्या आधारे त्यांनी सरकारवर आरोपांची झोड उठवली. गोवा आता पूर्वीसारखा राहिला नसल्याची खंत व्यक्त केली. सरदेसाई यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यालयाला ई-मेलद्वारे २,१९३ सूचना प्राप्त झाल्या. यावरून जनता सरकारच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट होते. पर्रीकरांच्या काळातील सेवा हमी कायदा पूर्णपणे कोलमडला असून, सरकारी कामांत विलंब, दरवाढीमुळे सामान्य माणूस भरडला जात आहे.