जनतेचे ऐकायचे नसेल तर चालते व्हा!; निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांचा जाहीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:48 IST2026-03-17T10:47:21+5:302026-03-17T10:48:20+5:30
खुल्या सभागृहात झालेला 'इनफ ईज इनफ'च्या जाहीर सभेत रिबेलो यांनी हा इशारा दिला.

जनतेचे ऐकायचे नसेल तर चालते व्हा!; निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांचा जाहीर इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असून, जनतेचे ऐकायलाच हवे. जे जनतेचे ऐकणार नाहीत, त्यांनी चालते व्हावे, असा इशारा निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी दिला. श्रीस्थळ-वडामळ येथील पंचायतीजवळील खुल्या सभागृहात झालेला 'इनफ ईज इनफ'च्या जाहीर सभेत रिबेलो यांनी हा इशारा दिला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक कमलाकर म्हाळशी होते. व्यासपीठावर पर्यावरण संरक्षक डेनिस फर्नाडिस, कल्पना भट, संयोजक संदेश प्रभुदेसाई, रमेश कोमरपंत, वासालो कारवालो, मनोज प्रभुगावकर, आदिवासी समाज अभ्यासक देवीदास गावकर उपस्थित होते.
रिबेलो म्हणाले की, नद्या, डोंगर नष्ट करण्याचा अधिकार सरकारलाही. नद्या, डोंगर सांभाळणाचा हक्क नागरिकाचा आहे. सरकार फक्त विश्वस्त आहे. आता गोवा सांभाळण्याची वेळ आली आहे. आमची लोकशाही, आमची संस्कृती नष्ट करायला अधिकार कुणालाच नाही.
प्रभुदेसाई म्हणाले की, आयआयटी काणकोणमध्ये यावी, याकरिता मी - सुरुवातीला समर्थन केले होते; पण चांगल्या प्रकल्पाच्या नावाने सरकार जनतेला मूर्खात काढत असल्याचे दिसून येते.
सर्व काही जनतेसाठी नव्हे, हे माहिती हक्क कायद्याद्वारे कळून चुकले. आता विश्वास तरी कुणावर ठेवावा, असा प्रश्न संदेश - प्रभुदेसाई यांनी यावेळी केला.
कल्पना भट, डेनिस फर्नांडिस यांनी पर्यावरण रक्षणासंबंधी पैंगिण, लोलये, पोळे येथील प्रकल्पासंबंधी माहिती दिली.
नागरिकांच्या हक्कांविषयी पुस्तिका काढणार
रिबेलो म्हणाले की, नागरिकांचे काय हक्क आहेत, यासंबंधी माहिती देणारी पुस्तिका येत्या काही दिवसांत काढणार आहे. 'इनफ ईज इनफ'च्या बैठका गावोगावी घेतल्या जातील व जनतेमध्ये जागृती केली जाईल. गोमंतकीयांना आता जागे व्हावे. पुढील पिढीसाठी गोवा राखून ठेवण्याकरिता आमच्या सोबत यावे.
पर्यावरण रक्षणाची चळवळ सुरू : म्हाळशी
म्हाळशी यांनी सांगितले की, आता पर्यावरण रक्षणासाठी खरी चळवळ सुरू झाली आहे. ज्या आदिवासींनी जमिनींचे रक्षण केले, ज्या जमिनी वाचविल्या, त्याच जमिनीपासून आदिवासी समाज आज दूर झाला आहे. त्यांना जमिनीचा कोणताच हक्क मिळालेला नाही. ज्यांच्यावर जंगलांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच जंगलांचे नुकसान होते.