छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यात हिंदू धर्म टिकला; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 10:02 IST2026-04-05T10:01:25+5:302026-04-05T10:02:01+5:30
साखळी रवींद्र भवनात राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यात हिंदू धर्म टिकला; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : दिवाळीत नरकासुर प्रतिमा बनवण्याऐवजी 'किल्ले बनवा स्पर्धे'चे आयोजन केल्याने मुलांवर चांगले संस्कार होतात. या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या गोव्यातील कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळे गोव्यात हिंदू धर्म टिकून राहिला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना आणि अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज यांनी गतवर्षी पुरातत्व संचालनालयाच्या सहकार्याने दीपावलीला गोव्यात प्रथमच राज्यस्तरीय 'किल्ले बनवा स्पर्धे'चे आयोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा साखळी येथील रवींद्र भवन येथे शुक्रवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
याप्रसंगी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, वास्कोचे आमदार दाजी (कृष्णा) साळकर, पुरातत्व
संचालनालयाचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई, 'अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटने'चे अध्यक्ष संकेत आर्सेकर, सचिव सत्यविजय नाईक, 'मर्दनगड संवर्धन समिती'चे मार्गदर्शक रमेश शिंदे आदीची व्यासपीठावर उपस्थिती होती.
साळकर, फळेदसाईंचा सत्कार
यावेळी फोंडा येथील 'मर्दनगडा'चे संवर्धन व्हावे, यासाठी गोवा विधानसभेत मागणी करणारे वास्कोचे आमदार दाजी (कृष्णा) साळकर आणि 'मर्दनगडा'च्या संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे तत्कालीन पुराभिलेक अन् पुरातत्व मंत्री आणि विद्यमान मंत्री सुभाष फळदेसाई यांचा या कार्यक्रमात 'मर्दनगड संवर्धन समिती' आणि अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना' यांच्या वतीने आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
'मर्दनगड' अधिकृत वारसास्थळ होणार
आमदार साळकर म्हणाले की, पुढील एका महिन्यात 'मर्दनगड' अधिकृत वारसास्थळ म्हणून घोषित होईल आणि किल्ल्याच्या संरक्षणाच्या कामास प्रारंभ होईल. तसेच गोव्यातील सर्व किल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, किल्ले हे केवळ माती-दगडांचे बांधकाम नसून ते स्वाभिमान, वारसा आणि धर्मरक्षणाचे प्रतीक आहेत. 'किल्ले बनवा स्पर्धा' गावागावांत पोहोचणे आवश्यक असून त्यातून हिंदवी स्वराज्याचा वारसा सर्वांपर्यंत पोहोचेल.
प्रारंभी अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचे अध्यक्ष संकेत आर्सेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव सत्यविजय नाईक यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन गौरी देसाई आणि मिथिल फळदेसाई यांनी केले.
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या अखेर स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.