गोविंद गावडे उटीत, मंत्रिपद अद्याप मुठीत; विरोधकांना मिळाले आयते कोलित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:22 IST2025-05-28T07:21:34+5:302025-05-28T07:22:29+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या कडक व आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच

गोविंद गावडे उटीत, मंत्रिपद अद्याप मुठीत; विरोधकांना मिळाले आयते कोलित
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरकारमध्ये व भाजपमध्येही अजून खळबळ आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गोविंद गावडे यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी, अशी आक्रमक भूमिका घेतलेली असली तरी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अजून तसे आक्रमक नाहीत. अन्यथा, त्यांनी आतापर्यंत मंत्रिपद काढून घेतले असते. दामूंनी कडक भूमिका घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
तथापि, क्रीडा मंत्री गोविंद गावडे हे आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांसोबत उटीत सुटी घालवत आहेत. तूर्त तरी मंत्रिपद त्यांच्या मुठीतच आहे. त्यांचे मंत्रिपद काढून घ्या, असा आदेश अजून दिल्लीहून आलेला नाही. त्यामुळे गावडेही निश्चिंत असल्याची माहिती मिळाली.
सावंत सरकारला अंतर्गत संघर्षाने ग्रासलेय माणिकराव ठाकरे
'सावंत सरकारला अंतर्गत संघर्षाने ग्रासले आहे. मंत्री आणि सत्ताधारी आमदार पैशांवरून आपापसांत भांडत आहेत. हे सरकार सामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून संपत्ती जमा करण्यावरच लक्ष केंद्रित करीत आहे,' अशी टीका काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, मंत्री गावडे यांनी स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. आम्ही आगामी काळात हे सर्व मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहोत.
गावडेंना काँग्रेसचा पाठिंबा : खासदार विरियातो
मंत्री गोविंद गावडे आदिवासी कल्याण खात्यातील भ्रष्टाचाराबद्दल जे बोलले ते सत्यच आहे. सरकार त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याऐवजी भ्रष्टाचार उघड केला म्हणून त्यांना टार्गेट करत आहे', अशी टीका करत काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील खासदार विरियातो फर्नांडिस यांनी गावडे यांना पाठिंबाच दिला. विरियातो म्हणाले की, 'गावडे सत्यच बोलले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आरोपांची चौकशी करायला हवी. चार दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आम्ही कोणतेही मोठे रस्ते प्रकल्प हाती घेतो, तेव्हा काही मंत्री, आमदार यांना ही गोष्ट कळल्यावर जमिनी घेतात असे सांगितले होते. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार फोफावला आहे.
गावडेंवर कारवाईबाबत भाजप ठाम : दामू नाईक
आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मंत्री गोविंद गावडेंवर कारवाईबाबत भाजप ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, 'उटा'कडून गावडे यांच्या भाषणाचा कोणताही व्हिडीओ मला मिळालेला नाही. गावडे जे बोलले, ते चुकीचेच आहे. त्यांनी तक्रार योग्य व्यासपीठावर मांडायला हवी होती. एक तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोलायला हवे होते. अनुसूचित जमातीला भाजप सरकारनेच वेळोवेळी न्याय दिला. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे कारवाई अटळ आहे.
हे तर सरकारविरुद्ध प्रमाणपत्र : आमदार फेरेरा
काँग्रेसचे आमदार कार्ल्स फेरेरा म्हणाले की, 'जेव्हा एखादा मंत्री त्यांच्याच सरकारमधील भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तेव्हा सरकारविरुद्ध ते प्रमाणपत्रच ठरते. गावडे यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंबंधी आरोपांबद्दल त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. पूर्वीही माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या विधानावर कारवाई केली होती का?