गोवा हरित अर्थव्यवस्थेकडे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:19 IST2026-01-28T07:19:06+5:302026-01-28T07:19:42+5:30
बेतुल येथे 'इंडिया एनर्जी वीक २०२६' चे उद्घाटन

गोवा हरित अर्थव्यवस्थेकडे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा हरित आणि नील अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, अशा आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब असून, यामुळे राष्ट्रीय विकासासोबतच स्थानिक रोजगार व संधींनाही चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बेतुल येथे मंगळवारी इंडिया एनर्जी वीक २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी, तसेच यूएईचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि अॅडनॉक समूहाचे सीईओ डॉ. सुलतान अल जाबेर यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि देश-विदेशातील प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्य आभासी संदेशाने उद्घाटन सोहळ्यास विशेष उंची प्राप्त झाली. १२० हून अधिक देशांतील व्यावसायिक व प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
'गोवा शंभर टक्के अक्षय ऊर्जा राज्य बनेल'
दरम्यान, २०५० पर्यंत गोवा शंभर टक्के अक्षय ऊर्जा राज्य बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ऊर्जा संक्रमणाच्या दृष्टिकोनासह गोव्याने स्वच्छ ऊर्जा रोडमॅप तयार केला आहे. अधिकाधिक अक्षय ऊर्जा निर्माण करण्यासाठी गोवा कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
सिंग म्हणाले की, अणुऊर्जा व जहाजबांधणी क्षेत्रालाही चालना दिली जात आहे. २०४७ पर्यंत १०० गीगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. तेल व वायू व्यापारासाठी ६० नव्या जहाजांची तातडीची गरज असून त्यातून ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक संधी निर्माण होणार आहे.
इंडिया एनर्जी वीक वेगाने एका विश्वासार्ह जागतिक व्यासपीठात विकसित केले आहे, जे जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील अभूतपूर्व संक्रमण आणि अस्थिरतेच्या काळात धोरणकर्ते, उत्पादक, ग्राहक, तंत्रज्ञान प्रदाते आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणते. पुरी यांनी तेल, वायू, जैवइंधन, हरित हायड्रोजन, एलएनजी आणि स्वच्छ स्वयंपाक इंधनांमध्ये शाश्वत गुंतवणुकीची गरज अधोरेखित केली.
आणखी चार दिवस परिषद
दरम्यान, पुढील चार दिवस ३० पर्यंत इंडिया एनर्जी वीक परिषद गोव्यात चालणार आहे. भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संरक्षणाखाली आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री आणि डीएमजी कार्यक्रमांच्या संयुक्त विद्यमाने ती आयोजित केली आहे. जागतिक ऊर्जा परिवर्तनाच्या केंद्रस्थानी भारत आपली भूमिका मजबूत करत असताना इंडिया एनर्जी वीक २०२६ धोरणकर्ते, व्यावसायिक नेते, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्यासाठी व्यावहारिक उपाय चालविण्यासाठी एकत्र करेल.
ऊर्जा सुरक्षा व स्थैर्य राखणे आवश्यक : हरदीप सिंग पुरी
केंद्रीय पेट्रोलियममंत्री म्हणाले, की नवीकरणीय ऊर्जेचा जागतिक विद्युत निर्मितीतील वाटा वाढत असला तरी, पारंपरिक तेल व वायू क्षेत्रातील गुंतवणूक थांबल्यास जागतिक तेल उत्पादन दरवर्षी ८ टक्के घटेल. त्यामुळे ऊर्जा संक्रमणासोबत ऊर्जा सुरक्षा व स्थैर्य राखणे आवश्यक आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक असून, २०५० पर्यंत भारताचा जागतिक ऊर्जा मागणीत १० टक्के वाटा असेल. भारतात प्रति व्यक्ती ऊर्जा वापर अजूनही जागतिक सरासरीच्या ५० टक्के इतकाच असल्याने वाढीची मोठी संधी आहे.