राज्यात रंगली नोकऱ्यांची 'रंगपंचमी'!; कर्मचारी निवड आयोगाकडून १,११७ उमेदवारांची निवड जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:05 IST2026-03-04T12:05:28+5:302026-03-04T12:05:28+5:30
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर पार पडल्याने कर्मचारी भरती आयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यात रंगली नोकऱ्यांची 'रंगपंचमी'!; कर्मचारी निवड आयोगाकडून १,११७ उमेदवारांची निवड जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कर्मचारी निवड आयोगाने 'गुणवत्तेचा गुलाल' उधळत पारदर्शकतेचा आणखी एक अध्याय रचताना विविध सरकारी पदांसाठी १,११७ उमेदवारांची निवड जाहीर केली आहे. राज्यातील तरुणांच्या आयुष्यात 'यशस्वी' रंगांची उधळण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर पार पडल्याने कर्मचारी भरती आयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयोगाने कनिष्ठ लिपिक, शिपाई, शिक्षक, अकाउंटंट, पंचायत सचिव, लेखापाल, लॅबोरेटरी असिस्टंट इ 'क' श्रेणीतील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत गुणवत्तेनुसार केवळ पात्र आणि हुशार उमेदवारांनाच संधी दिली. 'ज्यांनी मेहनत केली, त्यांनाच फळ मिळाले' अशी भावना निवड झालेल्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे. अधिकृत माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारांपैकी ६०३ जण उत्तर गोव्यातील असून हे प्रमाण ५४ टक्के तर ५१४ जण दक्षिण गोव्यातील असून हे प्रमाण ४६ टक्के आहे.
सामान्य कुटुंबांतील मुलांना दिलासा
पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असलेल्या या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांनाही सरकारी सेवेत जाण्याची संधी मिळाली आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या या शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास वाढला आहे. यापूर्वी सरकारी नोकऱ्यांमधील निवडीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, कर्मचारी भरती आयोग आल्यापासून हे प्रश्नचिन्ह दूर झाले आहे.
अशी आहे उमेदवारांची निवड
मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात ५४, फोंड्यात ६८, प्रियोळमध्ये ६०, मडकईत ५१, पर्वरीत ५०, काणकोणात ४८, मांद्रे ४७, पेंडणे ४३, डिचोली २८, थिवी ३१, म्हापसा २७, शिवोली २४, साळगांव १९, कळंगुट ०५, पणजी १९, ताळगांव २९, सांताक्रुझ २४, सांत आंद्रे १९, कुंभारजुवें ३०, मयें २२, पर्ये ३४, शिरोडा ३८, मुरगांव ७, वास्को ३१, दाबोळी १०, कुठ्ठाळी ६, नुवें ९, कुडतरी ७, फातोर्डा १०, मडगांव २७, नावेली १२, कुंकळ्ळी २८, वेळ्ळी ७, कुडचडें ३६, सावर्डे ३७, सांगे ३५ व काणकोण ४८ अशी उमेदवारांची निवड झालेली आहे. बाणावली मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजे केवळ ३ उमेदवारांची निवड झाली आहे.
मेरिटवर अंतिम निवड
राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे गुणवत्तेवर निवड होत असली तरी काही आमदार मात्र त्यांचा वशिला चालत नसल्याने नाराज आहेत. आयोगामुळे आमदारांचे महत्त्व कमी झालेले आहे. ते नोकऱ्या देऊ शकत नाहीत, हे लोकांनाही कळून चुकले आहे. लोकांना नोकरभरती आयोगामार्फतच झालेली हवी आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या विश्वासार्हतेवर हे शिक्कामोर्तब असल्याचे मानले जाते.
फोंडा मतदारसंघ शैक्षणिकदृष्ट्या प्रगत मानला जातो, त्याचा फायदा उमेदवारांना झाला असावा, असे मानले जाते. प्रियोळ आणि साखळी या भागांतून मोठ्या प्रमाणात तरुणांनी तांत्रिक आणि शैक्षणिक पदांसाठी अर्ज केले होते. - मडकई आणि पर्वरीतील उमेदवारांचा कल 'क' श्रेणीतील प्रशासकीय नोकऱ्यांकडे अधिक होता. पंचायत सचिव, लेखापाल या पदांसाठी मोठी स्पर्धा होती.