येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी १० मतदारसंघांत पक्ष विस्तारणार; विजय सरदेसाई यांचा नवीन वर्षाचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:47 IST2026-03-20T07:47:16+5:302026-03-20T07:47:31+5:30
येत्या विधानसभा अधिवेशनाच्या दृष्टीने गोवा फॉरवर्ड पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी १० मतदारसंघांत पक्ष विस्तारणार; विजय सरदेसाई यांचा नवीन वर्षाचा संकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येत्या विधानसभा अधिवेशनाच्या दृष्टीने गोवा फॉरवर्ड पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे. यापुढे काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांच्या निर्णयांवर अवलंबून न राहता गोवा फॉरवर्ड पक्षाचा विस्तार हेच ध्येय ठेऊन काम करणार आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किमान दहा मतदारसंघात पक्षाची कार्यकारणी तयार करणार आहोत. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असा नवीन वर्षाचा संकल्प गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी जाहीर केला.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, काँग्रेसकडूनच आरोप होत असल्याने आता पुन्हा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन चालणे जास्त शक्य होणार नाही. त्यामुळे आता आमदार व गोवा फॉरवर्ड पक्ष म्हणून पुन्हा लोकांमध्ये जाणार आहे. फातोड्र्ध्यातून याला सुरुवात करणार आहे. नंतर राज्यभर फिरणार आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवनातून वाटते की, २०२७ मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विधानसभा निवडणूक होईल. त्या अनुषंगाने एप्रिल २०२७ च्या शेवटपर्यंत दहा मतदारसंघातील गोवा फॉरवर्डची कार्यकारणी समिती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
काँग्रेसच्या सध्याच्या नेत्यांना वाटत असावे की, मी कॉंग्रेसमध्ये येणार आहे किंवा काँग्रेसच्या निर्णयांचा भाग होणार आहे. याच भीतीने विरोधी पक्षनेते किंवा इतर आमदार आरोप करत आहे. विधानसभेत मी जे काही केले किंवा सभापतींना सल्ला दिला हा कामकाजाचा भाग आहे. व्होट ऑफ अकाऊंट हेच यावेळी योग्य पर्याय होता. कारण २४ हजार कोटींचा अर्थसंकल्प कुठल्याही चर्चेशिवाय पास करणे हा लोकांवर अन्याय आहे. यापूर्वी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हा पर्याय वापरला होता. त्यात काहीच चुकीचे किंवा सेटींग म्हणण्यासारखे नाही, असेही सरदेसाई म्हणाले.
काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी आगामी निवडणूक लक्षात घेत जर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला तरच ही समस्या सुटू शकते. हे सगळ्या गोष्टी ती खुचीं आपल्या हातातून जाऊ शकते या भीतीनेच होत आहे, असे सरदेसाई म्हणाले.
काँग्रेस नेतृत्वाला दिलेला शब्द पाळला
भाजपची साथ सोडल्यानंतर काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे केंद्रिय नेतृत्व राहुल गांधी यांना शब्द दिला होता की, २०२२ पर्यंत काँग्रेससोबत राहीन आणि तो शब्द मी शब्द पाळला, असे सांगून सरदेसाई म्हणाले, जेव्हा भाजपला सरकार बनविण्यासाठी एका आमदाराची गरज होती, तेव्हा देखील मी काँग्रेससोबत थांबलो. त्यानंतर काँग्रेसमधील आठजण फुटीर भाजपमध्ये गेले. आता चित्र वेगळे आहे. लोकांनाही हे आता कळायला लागले आहे. आता गोमंतकीयांना एका प्रस्थापित विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठीच माझा पक्ष काम करणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
विरोधकांमध्ये एकी नाही
विरोधक कधीच सरकारविरोधात बोलताना दिसत नाही. आमच्यामध्येत आमचे पटत नाही, असेच होत चालले आहे, हे लोकांबरोबरच सरकारच्याही लक्षात येत आहे. प्रत्येक विरोधी पक्ष आपल्यापरीने विचार करत आहे. भाजप हा मजबूत पक्ष आहे, केवळ सक्षम युतीच भाजपला पराभूत करू शकते. पण हे होणे शक्य वाटत नाही.
फोंडा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेशिवाय अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल याचा अंदाज मला पहिलाच आला होता, तेव्हाच मी यांना सांगितले होते. पण त्यांनी त्यावेळी काहीच हालचाली केल्या नाही, आणि आता निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या गोष्टी ते करत आहे. राज्यपालांकडे जाण्याबाबत देखील काँग्रेसने आधी आरजी व इतर पक्षातील विरोधी आमदारांना सांगितले व नंतर ऐन क्षणी मला सांगण्यात आले.
याचा अर्थ असाच होतो की मी त्यांना तिथे आलेला नको होतो. हे अंतर्गत वाद संपत नाही तोपर्यंत आम्ही लोकांच्या समस्या मांडूच शकत नाही, असेही आमदार सरदेसाई म्हणाले.