'म्हादई'चे पाणी वळवू नका; बेळगावमध्ये मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:36 IST2025-06-04T08:35:19+5:302025-06-04T08:36:03+5:30
शेतकरी, विद्यार्थ्यांसह पर्यावरणप्रेमी एकवटले

'म्हादई'चे पाणी वळवू नका; बेळगावमध्ये मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादाई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पांमुळे गोव्यालाही मोठा फटका बसणार असून, संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर वाळवंटात होणार असल्याची भीती व्यक्त करत काल सकाळी 'रॅली फॉर बेळगाव'च्या बॅनरखाली बेळगावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
यावेळी बेळगाव शहरातील सरदार हायस्कूल मैदानावर पर्यावरणप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांसह नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव आणि पश्चिम घाटातील जंगले, तलाव आणि धबधबे यांचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश होता. निदर्शकांनी सांगितले की, ही चळवळ केवळ पाण्याबद्दल नाही, तर पाण्याचा न्याय सुनिश्चित करणे, जैवविविधतेचे रक्षण करणे आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे यासाठी देखील आहे.
कर्नाटकने पाणी वळवण्याच्याबाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकताना अलीकडेच कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी भूसंपादनाबाबत खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. पाणी वळवल्यास बेळगाव तसेच उत्तर कर्नाटक भागावर मोठा परिणाम होईल, अशी भीती स्थानिकांनाही आहे. त्या पार्श्वभूमीवरच हे आंदोलन होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सदर मोर्चाची सांगता झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. म्हादई प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाविरोधातील आजच्या या जनआंदोलनाचे नेतृत्व दिलीप कामत, शिवाजीराव कागणीकर, कॅ. नितीन धोंड, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, सुरेश हेबळीकर, नाईला कोयलो, नीता पोतदार, शारदा गोपाळ, सुजित मुळगुंद आदींनी केले.
गोव्यात चळवळीला बळ मिळणार
म्हादईचे नदीचे पाणी वळवल्याने वन्यजीव तसेच मानव जीवितावर कोणताही परिणाम होणार नाही, असा अहवाल एनआयओने दिल्याने त्यावरून गोव्यात गेले काही दिवस खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी हा विषय उचलून धरला. आरजीने दोनापावला येथे एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली होती. गोव्यातून पाणी वळविण्यास विरोध करणाऱ्या म्हादई बचाव आंदोलन, स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या चळवळीला बेळगावच्या या आंदोलनामुळे बळ मिळाले आहे.
आम्ही मात्र गप्पच : राजन घाटे
म्हादई आमची जीवनदायिनी आहे. पण, म्हादईसाठी राज्यात कुठेच चळवळ होत नाही, उलट कर्नाटकमधील बेळगाव येथे म्हादई वळविण्याविरोधात मोर्चा काढला जात आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आम्ही देखील या मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे, तरच म्हादई वाचणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिली. प्रा. राजेंद्र केरकर यांनी अनेकदा आम्हाला मार्गदर्शन केले आहे, पण त्यांना लोकांकडून बळ मिळाले नाही. व्याघ्रप्रकल्प क्षेत्र व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, तेव्हा आमच्याच पंचायतीमधील सरपंच, पंच सदस्यांनी दबावात येत याला विरोध केला. उच्च न्यायालयाने आम्हाला व्याघ्र प्रकल्प क्षेत्र करण्यासाठी मान्यता दिली आहे तर ते का होत नाही? आमच्याच स्वार्थासाठी आम्ही म्हादईचा गळा घोटला आहे, असे घाटे यांनी यावेळी सांगितले. म्हादईच्या विषयावरून राजन घाटे यांनी मंगळवारी आझाद मैदान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी व इतर मान्यवर उपस्थित होते. म्हादई वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्प क्षेत्र घोषित करणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंत या विषयासाठी सरकारने ७ ते ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. मंत्री विश्वजित राणे म्हणतात की, राज्यात वाघ नाही. परंतु, आज वाघ, बिबटे गावागावात पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन घाटे यांनी केले.