दामू नाईकांनी नेत्यांसमोर मांडली पक्षाची भूमिका; दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:30 IST2026-04-11T08:28:12+5:302026-04-11T08:30:35+5:30
या बैठकीत फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

दामू नाईकांनी नेत्यांसमोर मांडली पक्षाची भूमिका; दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा
पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपमध्ये संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच पक्ष संघटनाबाबत सविस्तर माहिती दिली.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत हालचाली तसेच आगामी काळातील रणनीती यावर चर्चा झाली.
याचबरोबर भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
दरम्यान, रितेश नाईक यांना मंत्रिपद देण्याच्या शक्यतेबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर येत असली, तरी याबाबत अधिकृतरीत्या स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचा अधिकार
यासंदर्भात लोकमतने दामू नाईक यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. "पक्षाची भूमिका आम्ही केंद्रीय नेतृत्वासमोर स्पष्टपणे मांडली आहे," एवढेच त्यांनी सांगितले. ते म्हणाले की मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे.
गोव्यातील राजकीय स्थितीविषयी चर्चा
दिल्लीतील भेटीदरम्यान आपण केवळ गोव्यातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटन याबाबतच चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे किंवा वगळायचे, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो." फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः रितेश नाईक यांच्या नावाभोवती सुरू असलेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, भाजपकडून या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नसून, पुढील काही दिवसांत केंद्रीय नेतृत्व व राज्य नेतृत्व यांच्यातील चर्चेनंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.