पर्येत १५ हजार लोकांची गर्दी, अभंग रिपोस्टमध्ये भक्तीचा पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:41 IST2026-03-31T07:40:25+5:302026-03-31T07:41:58+5:30
अभंग रिपोस्टने वातावरण दणाणून सोडले.

पर्येत १५ हजार लोकांची गर्दी, अभंग रिपोस्टमध्ये भक्तीचा पूर
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्ये : सत्तरी तालुक्याने अभंग रिपोस्ट ह्या कार्यक्रमाला वेगळाच आयाम दिला. पूर्ण तालुका अभंग रिपोस्टमध्ये दुमदुमला. काल, सोमवारी पर्ये येथील भव्य मैदानावर सुमारे पंधरा हजार रसिकांनी गर्दी केली.
अलोट गर्दीने अभंग रिपोस्टच्या संगीतावर ठेका धरला. भक्ती व तेजाचे वेगळेच वातावरण निर्माण झाले. आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पर्येतील कार्यक्रम झाला. हजारो महिला, युवक, पुरुष, पंच, आजी-माजी सरपंच व अन्य अनेक संगीत रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. अभंग रिपोस्टने वातावरण दणाणून सोडले.
अभंग रिपोस्टच्या ठेक्यावर हजारोंच्या गर्दीने ठेका धरला. विठूरायाच्या गजराने आबालवृद्ध सगळेच खूश झाले. भक्तीचा महापूरच अनुभवास आला.
रविवारी उसगाव येथे कार्यक्रम झाला होता. तो कार्यक्रम मंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. काल पर्यंत अभंगवाणीचे अमृत युवा वर्गाच्या मनावर शिंपडले गेले. आमदार दिव्या राणे यांनी कार्यक्रमाच्या आपले मनोगत सुरूवातीलाच व्यक्त केले.
आजच्या आपल्या युवा पिढीला संत साहित्य व आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख व्हायला हवी. त्यासाठी अशा प्रकारचे अभंगांचे कार्यक्रम खूप उपयुक्त ठरतात, असे त्या यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमामधून दरवर्षी विठुरायाच्या गजरामध्ये पायी पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची आस व तळमळ कशी असते, याची नेमकी प्रचिती आज पुन्हा आली, असे आमदार दिव्या राणे यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला मंत्री विश्वजीत राणे, त्यांच्या आई विजयादेवी राणेही उपस्थित राहिल्या होत्या.