भ्रष्टाचाराचे आरोप हा राजकीय कट, केंद्राच्या खोट्या आरोपांमुळे पुरावा सापडला नाही: केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:47 IST2026-03-18T07:45:58+5:302026-03-18T07:47:11+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप हा केवळ राजकीय कट होता, असा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला.

भ्रष्टाचाराचे आरोप हा राजकीय कट, केंद्राच्या खोट्या आरोपांमुळे पुरावा सापडला नाही: केजरीवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विरोधकांना लक्ष्य करण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. मनिष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना महिनोनमहिने तुरुंगात ठेवण्यात आले, तरीही कोणीही दोषी आढळले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप हा केवळ राजकीय कट होता असा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला.
केजरीवाल म्हणाले की, खोट्या दारू धोरण प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, मात्र कोणताही पुरावा सापडला नाही आणि ६०० पानी न्यायालयीन आदेशातही खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार नव्हता.
पणजीत अरविंद केजरीवाल यांचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केजरीवाल यांनी वरील आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत आपचे राज्य निमंत्रक वाल्मिकी नायक, गोवा प्रभारी आतिशी, आमदार वेंझी विएगस, क्रूझ सिल्वा, जिल्हा पंचायत सदस्य अँटोनियो लिआओ फर्नांडिस, नगरसेवक जॅक सुखिजा व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मनपा निवडणुकीतील नगरसेवक जॅक सुखिजा आणि जिल्हा पंचायत विजेते अँटोनियो लिआओ फर्नांडिस यांचाही गौरव करण्यात आला.
आपगोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मीकी १ नायक तसेच आमदार क्रूझ सिल्वा आणि व्हॅझी व्हिएगस यांनी या निकालाला सत्याचा विजय म्हटले. आपने स्पष्ट केले की या निर्णयामुळे पक्षाचा प्रामाणिक राजकारणासाठीचा लढा अधिक २ बळकट झाला असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपला सक्षम पर्याय म्हणून पक्ष उभा राहील.
'आप'ला रोखण्यासाठी भाजपकडून बदनामी
केजरीवाल यांनी सांगितले की, आपचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी भाजप नेतृत्वाने हा मोठा राजकीय कट रचला. सत्ता, पैसा आणि केंद्रीय यंत्रणा असूनही भाजप आपचा राजकीय पराभव करू शकला नाही, म्हणून बदनामी आणि अटकांचा मार्ग अवलंबला. दिल्ली आणि पंजाबमधील शिक्षण, आरोग्य, मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक यांसारख्या कामांमुळे आपची राजकारणाची नवी दिशा भाजपसाठी आव्हान ठरली आणि त्यामुळे पक्षाला दडपण्याचा प्रयत्न झाला.
दोन दिवसांत फोंड्याचा निर्णय
केजरीवाल फोंडा पोटनिवडणुकी संदर्भात बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, पुढील एक-दोन दिवसांत बैठक घेऊन आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. फोंड्यात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ सांडपाणी, तुंबलेली गटारे आणि खराब पायाभूत सुविधा हे गंभीर प्रश्न आहेत. या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून, जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यावर भर दिला जात आहे.