पोलिसांच्या बदल्यांप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:24 IST2019-03-05T15:19:53+5:302019-03-05T15:24:50+5:30
पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि उपाधीक्षकांच्या अन्याय बदल्या केल्याची तक्रार समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून तक्रारीची प्रत भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनाही पाठवली आहे.

पोलिसांच्या बदल्यांप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
पणजी - पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि उपाधीक्षकांच्या अन्याय बदल्या केल्याची तक्रार समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून तक्रारीची प्रत भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनाही पाठवली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या पोलीस अधिकाऱ्यांना एकाच जागी तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत तसेच जे निवडणूक कामाशी संबंधित आहेत त्यांना दुसऱ्या तालुक्यात बदली करायला हवी. परंतु 22 फेब्रुवारी रोजी तत्कालीन पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या आदेशावरुन केलेल्या बदल्या या निर्देशांना धरुन नाहीत. चंदर यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाले का याची चौकशी केली जावी, अशी मागणी आहे. आयरिश यांचा असा दावा आहे की, एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत तर काहीजणांच्या अवघ्या एका वर्षातच बदल्या केलेल्या आहेत. पोलीस आस्थापन मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर करावे, अशी मागणी त्यानी केली आहे.
या बदल्या लोकसभा निवडणूक काळापुरत्याच मर्यादित आहेत का, किंवा निवडणुकीनंतर या पोलिस अधिकाऱ्यांना पूर्वीच्या जागी आणले जाणार आहे का, याबाबत आदेशात कोणताही उल्लेख नाही याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नव्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याच्या आदेशालाही पत्रात आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्या २३ रोजी पोलीस खात्यात घाऊक फेरबदल 9 पोलीस उपाधीक्षक, 46 निरीक्षक आणि 101 उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
उपाधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांना पणजीहून फोंडा येथे, सेराफिन डायस यांना म्हापशातून मडगावला, किरण पौडवाल यांना पर्वरीहून केपेंत, राजेंद्र राऊत देसाई यांना मडगावहून पणजीत सुरक्षा विभागात, महेश गांवकर यांना फोंड्याहून रायबंदर येथे गुन्हे शाखेत, उत्तम राऊत देसाई यांना केपेंहून पणजीत, सॅमी तावारिस यांना गुन्हे शाखेतून म्हापशात, एडविन कुलासो यांना पणजीतील सुरक्षा विभागातून पर्वरीला तर गजानन प्रभूदेसाई जे कोणत्याही पदाविना होते त्यांना पणजी पोलिस मुख्यालय उपाधीक्षकपदी पाठवले आहे.
46 निरीक्षकांच्या बदल्या केल्या त्यात प्रामुख्याने सिध्दांत शिरोडकर (पणजीहून गुन्हे शाखा रायबंदर), कपिल नायक (मडगांवहून म्हापसा), राहुल परब (गुन्हे शाखेतून कोलवा), परेश नाईक (पर्वरीहून गुन्हे शाखा रायबंदर), विश्वेश कर्पे (रायबंदरहून पर्वरी), नोलेस्को रापोझ (वास्कोहून क ळंगुट), जीवबा दळवी( कळंगुटहून अंमली पदार्थ विरोधी विभाग), शिवराम वायंगणकर ( वाळपईहून पणजी एटीएस), निलेश राणे (पणजी मुख्यालयातून वास्को) हरीश मडकईकर (फोंड्याहून पेडणे), संदेश चोडणकर (पेडणेहून वेर्णा), तुषार लोटलीकर (म्हापसाहून मडगांव), नवलेश देसाई (फातोर्डाहून हणजुण), शेख सलिम (पणजीहून फातोर्डा), प्रज्योत फडते (पणजीहून कुळें), संजय दळवी (डिचोलीहून पणजी), फिलोमेनो कॉस्ता (कोलवाहून डिचोली) शैलेश नार्वेकर (मुरगांवहून कोकण रेल्वे) यांचा समावेश आहे. याशिवाय 101 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केलेल्या आहेत.