म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:44 IST2025-06-04T08:42:48+5:302025-06-04T08:44:03+5:30
कचराफेकूंविरुद्ध कारवाई

म्हापशातील समस्यांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा; पालिका बैठकीत कचराप्रश्नाने वेधले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : म्हापसा पालिकेतील अभियंत्यांचे असहकार्य, फाईल्स प्रलंबित ठेवल्या जातात, कचरा मुद्दा, पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा मुद्दा, जुन्या इमारतींचा मुद्दा यासारख्या विविध मुद्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिकेत दि. ३ रोजी झालेल्या बैठकीत दिले.
म्हापशातील कचऱ्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन मंडळामार्फत कंत्राटदार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसे आदेश मंडळाला दिले जातील. पुढील ३ महिने हा कंत्राटदार पालिकेला कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करणार आहे. उघड्यावर तसेच शेजारील परिसरातून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री म्हापसा नगरपालिकेत जाऊन पालिका मंडळासमवेत म्हापशातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती ज्योशुआ डिसोझा, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, इतर नगरसेवक तसेच विविध खात्यातील अधिकारी व्यापारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दीड तासाहून अधिक वेळ झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी पालिकेतील विविध मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
तुंबणाऱ्या पाण्याबाबत ठोस तोडगा हवा
मान्सूनपूर्व कामांसाठी जलस्रोत खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सहकार्य लाभत नसल्याचे नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी निदर्शनाला आणून दिले. सदर सूचना मान्य करताना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश संबंधित खात्यांना दिले जातील. मात्र, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्यास कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे नार्वेकर म्हणाले.
प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश
थकीत कर वसूल करण्यास पालिकेकडून पावले उचलण्यात आली नसल्याने त्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्याची सूचना करण्यात आली. इतर पालिकेच्या तुलनेत म्हापसातील करवसुली कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आवश्यकता भासल्यास बँकेचे सहकार्य घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पडून असलेले प्रकल्प पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली.
पाणी तुंबण्यास लोकही जबाबदार
पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पाणी भरण्यास फक्त पालिकाच जबाबदार नसून लोकही तेवढेच जबाबदार आहे. लोकांनी नाल्यावर संरक्षक भिंती तसेच इतर बांधकामे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ८ दिवसात तोडगा काढण्याचे आदेशही देण्यात आले. पाण्याचा प्रश्न तसेच विजेच्या मुद्यावर तोडगा काढला जाईल.
... म्हणून मुख्यमंत्र्यांना केले निमंत्रित
कचऱ्याच्या मुद्यावर सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती, अशी माहिती ज्योशुआ डिसोझा यांनी दिली. तसेच इतर विविध मुद्यांवर तोडग्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.