मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मिराबाग आंदोलकांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:34 IST2026-03-31T07:33:54+5:302026-03-31T07:34:13+5:30
या प्रकल्पाबाबतच्या फाइलवर आपण तसे नोटिंग नमूद करू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मिराबाग आंदोलकांची माघार
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे/पणजी : 'मिराबागला बंधारा कदापि होणार नाही. यासंबंधीचे आश्वासन आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मी यापूर्वी दिलेले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे,' असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत मिराबाग येथील ग्रामस्थांनी सुमारे ४९ दिवसांचे आपले आंदोलन सोमवारी मागे घेतले. मिराबाग येथे बंधारा प्रकल्प होणार नाही. या प्रकल्पाबाबतच्या फाइलवर आपण तसे नोटिंग नमूद करू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
याबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी मिराबागच्या लोकांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांच्या अडचणी समजून घेऊन मी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार तथा सभापती गणेश गांवकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला बंधारा होणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिलेले आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेले ४० ते ४५ दिवस विनाकारण आंदोलन चालले आहे. मागील भेटीत शिष्टमंडळाने माझ्यासमोर काही गोष्टी मांडल्या. मला त्यांच्या भावना समजल्या. याठिकाणी जॅकवेल किंवा कोणताही प्रकल्प करण्याचा सरकारचा विचार नाही. बंधारा होणार नाही, असे मी स्पष्टपणे याआधी सांगितलेले आहे. मी पूर्ण जबाबदारीने हे विधान केलेले आहे.'
दरम्यान, पत्रकारांनी आंदोलक लेखी मागत आहेत, याबाबत विचारले असता सावंत म्हणाले की, 'मी लेखी का म्हणून द्यावे? मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आंदोलकांचा विश्वास नाही का? आंदोलकांना माझी विनंती आहे की, त्यांनी रस्ते वगैरे अडवून आंदोलन करू नये. माझा शब्द हा लेखी लिहून दिल्यासारखाच आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर तरी आंदोलकांनी विश्वास ठेवावा.'
पणजीत आझाद मैदान परिसरात जमावबंदी
दरम्यान, येथील आझाद मैदानावर मीराबाग-सावर्डे येथील बंधारा प्रकल्पाविरोधात तेथील ग्रामस्थांनी सोमवारपासून आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. तर सरकारच्या या निर्णयाचा आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याबाबतचा आदेश लागू केला होता.
चर्चेनंतर घेतला निर्णय
दरम्यान, मीराबाग येथील स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांची मडगाव गेस्ट हाऊस येथे सोमवारी दुपारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हा लढा थांबविण्याचा निर्णय घेतला. या विजयानंतर संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण आहे. आंदोलकांच्या त्यांच्या चारही मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वादग्रस्त प्रकल्प पूर्णपणे रद्द करणे आणि खाजन जमिनीशी संबंधित जुन्या मागण्यांची पूर्तता करणे या आश्वासनांचा समावेश आहे. सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त केला.