३८ दिवसांपासून चिंबलवासीयांचे आंदोलन; प्रकल्प परिसरातील पत्रे, मशिनरी हटविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:12 IST2026-02-04T11:12:09+5:302026-02-04T11:12:56+5:30
युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

३८ दिवसांपासून चिंबलवासीयांचे आंदोलन; प्रकल्प परिसरातील पत्रे, मशिनरी हटविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल प्रकल्पाच्या ठिकाणी लावण्यात आलेले पत्रे तसेच तिथे असलेली मशिनरी त्वरित हटवावी, अशी मागणी महिला आंदोलकांनी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाविरोधात पुकारलेले आंदोलन ३८ दिवसांनंतरही सुरूच आहे.
युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. सरकारने प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचा लेखी आदेश आम्हाला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महिला आंदोलनकर्त्या गीता म्हणाल्या की, तोयार तळी हे केवळ चिंबलसाठीच नव्हे तर परिसरातील इतर गावांसाठीही एक वरदान आहे. अशा ठिकाणी युनिटी मॉल व प्रशासन स्तंभसारख्या प्रकल्पांना आम्ही थारा देणार नाही.
लेखी आदेशाची वाट पाहतोय...
युनिटी मॉल प्रकल्पाच्या कामाला काही प्रमाणात सुरुवात झाली होती. त्यासाठी तिथे पत्रे लावण्यात आले होते तसेच मशिनरीही आणून ठेवण्यात आली होती. आता सरकार हे दोन्ही प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रकल्पस्थळी लावलेले पत्रे व मशिनरी तातडीने हटविण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत ही सर्व सामग्री त्वरित हटवली जात नाही आणि प्रकल्प हलवण्यात आल्याचा लेखी आदेश दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. गाव नष्ट होऊ देणार नाही," असे गीता यांनी स्पष्ट केले.