सारीपाट: सगळाच चिखलकाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 09:56 IST2023-07-02T09:55:19+5:302023-07-02T09:56:15+5:30

मुख्यमंत्री सावंत गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा दिल्लीला जाऊन आले.

chikhal kala utsav and goa political situation and consequences | सारीपाट: सगळाच चिखलकाला!

सारीपाट: सगळाच चिखलकाला!

- सद्गुरू पाटील

काँग्रेसचे तीन आमदार, फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आरजीचे बोरकर आणि आपचे दोन आमदार असा सातजणांचा गट शिल्लक आहे. विरोधकांये आणखी फूट पाडण्यात भाजपला आता रस नाही. राजकीय आघाडीवर आणखी पिालकाला नको... असे आता मुख्यमंत्री सावंतव भाजप श्रेष्ठींनाही वाटत असेल.

मुख्यमंत्री सावंत गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा दिल्लीला जाऊन आले. एकदा त्यांची दिल्लीतील भेट ही खासगी स्वरुपाची होती असे म्हणता येते. मात्र गोव्यातील प्रत्येक आमदाराला वाटतेय की, मंत्रिमंडळाची फेररचना होणार आहे आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल. मुरगावचे सकल्प आमोणकर मंत्रिपदाकडे डोळा लावून बसलेत. कळंगुटचे मायकल लोबोही प्रतीक्षा करत आहेत. खंवटे व लोबो यांचे पटत नाही. किनारी भागातील सत्तेची सुत्रे लोबो यांना स्वतःच्या हाती हवी आहेत. मंत्री खंवटे तसे होऊ देत नाहीत.

मंत्री फक्त मजा करत आहेत. उत्सवांमध्ये व सोहळ्यांमध्ये उधळपट्टी करत आहेत, पण आमच्या घरी मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. गेल्या महिन्यात नळाला पाणीच येत नव्हते, अशी तक्रार एका महिलेने लोकमतला फोन करून केली. ग्रामीण भागातील या महिलेचा लँडलाईनवर फोन आला होता. लोकांना मंत्र्यांची शो बाजी, चमकोगिरी आणि सरकारची कोट्यवधींची उधळपट्टी आवडत नाही. 

इव्हेंट मॅनेजमेंट आणि सोहळ्यांवर सावंत सरकारने सर्वाधिक खर्च केला आहे. कदाचित येत्या विधानसभा अधिवेशनात याबाबतचा हिशोब विरोधी आमदार सरकारकडे मागतीलच. सगळीकडे विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. ग्रामीण भागातील लोकांना नीट पाणी पुरवठाही सरकार करू शकत नाही आणि हर घर जलच्या गोष्टी सांगितल्या जातात. लोकांच्या जखमेवर अशा प्रकारे मीठ चोळले जाते.

शेकडो कोटी रुपये खर्च करण्याच्या व विकास प्रकल्प उभे करण्याच्या घोषणा केल्या जातात. सरकार पैसा खर्च करते पण हा पैसा नेमका जातो कुठे? पणजीत येऊन कुणीही स्मार्ट सिटीची दैना पहावी. मंत्री बाबूश मोन्सेरात व त्यांचे महापौर पुत्र स्मार्ट सिटीच्या दुर्दशेची जबाबदारी घेत नाहीत. ते सल्लागार कंपनी व अभियंत्यांकडे बोट दाखवतात. काही प्रमाणात त्यांचेही खरेच म्हणावे लागेल. मात्र पणजीच्या नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींविषयी, सरकारविषयी चीड आहे. रस्त्यांची चाळण झालीय, हे काकुलो मॉलसमोरून जाताना कळून येते. डांबर घालून दुरुस्त केलेले रस्तेही पुन्हा खचू लागलेत, म्हणून संताप वाढलाय.

सत्तरी तालुक्यापासून सांगेपर्यंत कुठेही चला. जून महिन्यापर्यंत तरी नळांचे रडगाणे सुरू असते. यावेळी तर जून महिन्यात पाऊस कोसळेपर्यंत म्हणजे १५ जूनपर्यंत बार्देशसह अन्य तालुक्यांतील लोकही पाण्यासाठी वणवण फिरत होते. शिवोलीचे लोक मोर्चा काढत होते. सांतआंद्रे मतदारसंघातील काही गावांतही तिच स्थिती होती. शिरोडा मतदारसंघातील काही गावांतही लोक पाण्याच्या समस्येने वैतागले होते. आता विजेची समस्या लोकांना छळतेय. अगदी सांताक्रुझ, करंजाळे, ताळगाव या शहरीकरण झालेल्या भागात देखील जरा वारा पाऊस आला की वीज जाते. लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारचा पैसा खर्च व्हायला नको का? 

सरकार रोज चिखलकाल्यात रमले आहे, असे लोकांना वाटते. उत्सवांमध्ये व सोहळ्यांमध्ये खर्च करण्यावर मंत्रिमंडल बहुतांश पैसा खर्च करतेय, अशी लोकांची भावना झाली आहे. बाबू आजगावकर उपमुख्यमंत्रिपदी होते तेव्हा पर्यटन खात्याकडून सरकारचा बराच पैसा विदेशात रोड शो आणि विदेश वाऱ्यांसाठी खर्च केला जात होता. गोवा मंत्रिमंडळाने केवळ अठरा मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यावर पूर्वी सात कोटी रुपये खर्च करण्याचा विक्रम केला आहे. 

गृह आधारच्या महिला, दयानंद सामाजिक सुरक्षा लाभार्थी किंवा लाडली लक्ष्मी योजनेखाली नियमितपणे हे सरकार पैसे देऊ शकत नाही. लाभार्थीपर्यंत अर्थसाहा दर महिन्याला पोहोचत नाही. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काही ठरावीक कंत्राटदारांना मात्र नियमितपणे कामाची कंत्राटे मिळतात व त्यांची बिलेही व्यवस्थित फेडली जातात. सरकार आपल्या प्रत्येक मोठ्या सोहळ्यासाठी अलिकडे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना कंत्राट देते. मग जेवणावळींसह अन्य बिले मोठ्या प्रमाणात असतात. एका अर्थाने कंत्राटदारांचा, बड्या पुरवठादारांचा, श्रीमंतांचा चिखलकाला राज्यात रोज सुरू आहे. मांडवी • किनारी परशुरामाचा मोठा पुतळा सरकारने उभा केला. पणजीपासून कांपाल ते मिरामारपर्यंत चालत जाण्यासाठी छान फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सध्या पावसाळा असल्याने मेरियट हॉटेलपर्यंतच जाता येते. उन्हाळ्यात थेट मिरामारपर्यंत जाता येईल. ही व्यवस्था मस्त असली तरी, त्याचा सगळा वापर हे कसिनोचे ग्राहकच जास्त करतील असे म्हणण्यास पूर्ण वाव आहे. सध्या पणजीतील सर्व रस्ते, फुटपाथ व सगळ्या जागा कसिनो ग्राहकांच्या वाहनांनी भरून टाकलेल्या आहेत. रात्री गोमंतकीयांना पणजीच्या काही भागांत वाहन ठेवायला जागाच मिळत नाही. कसिनोंचे ग्राहक आणि त्यांच्या वाहनांचे चालकच परशुराम पुतळ्याकडील फुटपाथ वापरू लागतील. त्यांच्याच सोयीसाठी हा विकास नव्हे ना? कसिनोवाल्यांचा चिखलकाला तर रोजच सुरू असतो.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे व कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी नुकताच चिखलकाल्याचा मस्त आस्वाद घेतला. माशेलमध्ये अगदी मस्तपैकी हे नेते चिखलकाला खेळले. वास्तविक पूर्ण मंत्रिमंडळाला देखील पुढील वर्षी चिखलकाल्याचे निमंत्रण गोविंद गावडे देऊ शकतील. सांज्याव, चिखलकाला वगैरे करत राहायला हवे. युवकही मग बेरोजगारी, महागाई, खंडित वीज असे प्रश्न विसरून जातात.

मुख्यमंत्री सावंत गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा दिल्लीला जाऊन आले. एकदा त्यांची दिल्लीतील भेट ही खासगी स्वरुपाची होती असे म्हणता येते. मात्र गोव्यातील प्रत्येक आमदाराला वाटतेय की, मंत्रिमंडळाची फेररचना होणार आहे. आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल. मुरगावचे संकल्प आमोणकर मंत्रिपदाकडे डोळा लावून बसलेत. कळंगुटचे मायकल लोबोही प्रतीक्षा
करत आहेत. खंवटे व लोबो यांचे पटत नाही. किनारी भागातील सत्तेची सुत्रे लोबो यांना स्वतःच्या हाती हवी आहेत. मंत्री खंवटे तसे होऊ देत नाहीत.

नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याची ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती. मात्र सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले म्हणून काही ख्रिस्ती धर्मियांची जास्त मते भाजपला मिळतील, असे म्हणता येत नाही. एखाद्या हिंदू मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून त्याजागी आलेक्स सिक्वेरा यांना बसविण्यास भाजपचे केंद्रीय नेते तयार नाहीत. यामुळे मुख्यमंत्री सावंत हेही मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय जास्त पुढे नेऊ शकत नाहीत. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना भाजपने अजून कोणतेही मोठे पद दिलेले नाही. कामत हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात विद्यमान सीएम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करणे योग्य ठरणार नाही असे काहीजणांना वाटते. कामत यांना दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात तिकीट दिले जाईल अशीही चर्चा आहेच. कामत, आलेक्स, लोबो वगैरे आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय मिळवले हे ते आमदारच सांगू शकतील. अर्थात त्यांना भाजपने सुरक्षितता प्रदान केली आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: chikhal kala utsav and goa political situation and consequences

टॅग्स :goaगोवा