राज्यात आजपासून जनगणना; दोन टप्प्यांत होणार काम, ३,०८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:19 IST2026-04-01T08:18:57+5:302026-04-01T08:19:31+5:30
या प्रक्रियेसाठी १६ भाषांमध्ये उपलब्ध असलेले विशेष मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आजपासून जनगणना; दोन टप्प्यांत होणार काम, ३,०८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशाच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना आज बुधवार, १ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून, राज्यात त्याअंतर्गत आजपासून 'स्व-गणना' हा टप्पा राबवला जाईल, अशी माहिती आयएएस अधिकारी चेष्टा यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१ एप्रिल ते १५ एप्रिलदरम्यान स्व-गणनेचा पहिला टप्पा राबवला जाईल, तर दुसरा टप्पा हा देशपातळीवरील जनगणनेचा आहे. तो ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या काळात राबवला जाईल. जनगणनेच्या कामासाठी एकूण ३ हजार ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात ४२२ शिक्षक व २ हजार ४६७सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
आयएएस अधिकारी यादव म्हणाल्या, 'आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनगणनेची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यात आली आहे. स्व-गणना या टप्प्यांअंतर्गत नागरिक स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदवू शकतील. त्यांना ३३ प्रश्नांची यादी दिली जाईल. १६ एप्रिल ते १५ मे २०२६ दरम्यान 'घर सूचीकरण' आणि 'गृहगणना' हा पहिला टप्पा पूर्ण होईल.
१६ भाषांमध्ये अॅप
या प्रक्रियेसाठी १६ भाषांमध्ये उपलब्ध असलेले विशेष मोबाइल अॅप विकसित करण्यात आला असून, त्यात कोंकणी भाषेचाही समावेश आहे. माहितीची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. त्यासाठी नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन यादव यांनी केले.
गणनेचा दुसरा टप्पा
दुसरा टप्पा म्हणजे 'लोकसंख्या गणने'चा असेल. हा ९ ते २८ फेब्रुवारी २०२७दरम्यान होणार आहे. या जनगणनेची अंतिम आकडेवारी १ मार्च २०२७ रोजी जाहीर केली जाईल. ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार असून, देशाच्या विकास धोरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तिन्ही जिल्ह्यात ५० फिल्ड सर्व्हेक्षक
राज्यात उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती अशा तीन जिल्ह्यांमध्ये विभागून जनगणना प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी ५० फिल्ड सर्व्हेक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी जनगणनेचे काम करतील. तिन्ही जिल्ह्यांचे संबंधित जिल्हाधिकारी हे जनगणना अधिकारी म्हणून काम पाहतील.