तूर्त गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, भाजपाची सावध भुमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 14:21 IST2018-09-16T13:57:35+5:302018-09-16T14:21:03+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी तूर्त मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

तूर्त गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, भाजपाची सावध भुमिका
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी तूर्त मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना तातडीने दिल्ली येथील एम्स् रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर गोव्यात नेतृत्वबदलासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय निरीक्षक गोव्यात दाखल झाले आहेत. निरीक्षक बी. एल. संतोष सकाळी दाखल झाले होते. तर विजय पुराणिक दुपारी पोहोचले. हे निरीक्षक पणजीतील ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथे भाजापचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तनावडे आणि इतर पदाधिकारी त्यांना भेटले. सरकारातील प्रत्येक आमदारांचे मत जाणून घेण्यापूर्वी पक्षाच्या कोअर टीमकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
निरीक्षकांना भेटून हॉटेलमधून बाहेर पडताना प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी नेतृत्व बदलाचा सध्या तरी प्रश्न नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली असून तेच सरकारचे नेतृत्व करतील. इतर काही बदल होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कोणते बदल ते स्पष्ट केले नाही. मुख्यमंत्री पदाचा ताबा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर किंवा नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सोपविण्याच्या प्रस्तावाविषयी विचारले असताही त्यांनी सध्या तशी गरज नसल्याचे सांगितले.