२०२७ मध्येही भाजप-मगो युती राहील: दीपक ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 08:09 IST2026-03-20T08:06:19+5:302026-03-20T08:09:02+5:30
युतीचा धर्म पाळताना आम्ही सर्वजण रितेश मागे उभे राहणार आहोत.

२०२७ मध्येही भाजप-मगो युती राहील: दीपक ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मगोचे प्रदेश अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, फोंडा पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. रवी नाईक यांचे निधन झाले त्याच दिवशी आम्ही श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले होते की, रितेश नाईक यांना उमेदवारी द्यायला हवी. त्यासाठी भाजपचे आभार मानतो. युतीचा धर्म पाळताना आम्ही सर्वजण रितेश मागे उभे राहणार आहोत.
केतन भाटीकर यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, राजकीय भवितव्य नजरेसमोर ठेवून त्यांनी पक्षांतर कले असेल. ते जरी रिंगणात असले तरी युतीच्या उमेदवाराला त्याचा कोणताही धोका नाही. मागच्या वेळी भाटीकर यांना जी मते मिळाली होती त्यामध्ये मगोच्या मतांचासुद्धा समावेश होता. त्यामुळेच ते त्यावेळेस अटीतटीची लढत देऊ शकले होते. यावेळी मगोची मते भाजपच्या मागे उभे राहणार आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या. त्यामुळे ते मगोप सोडून गेले. अन्य पक्षांमध्येही असे महत्त्वाकांक्षी लोक पक्ष सोडून गेलेले आहेत. आमची ही युती २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील कायम राहणार आहे.
उमेदवारीबाबत समाधान
फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने रखी नाईक यांचे पुत्र रितेश यांना तिकीट दिल्याने सरकारात घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 'रवींचे निधन झाले, त्याच दिवशी मी त्यांचे पुत्र रितेश यांना तिकीट दिले जावे, अशी मागणी केली होती. माझ्यानंतर इतरांनीही या मागणीला पाठिंबा दिला. रवी हे आमचे चांगले मित्र होते. त्यांचे कार्य कुणीही विसरू शकणार नाही. रवी यांच्या वारशाचा विचार करता त्यांच्या पुत्रालाच तिकीट देणे योग्य ठरले.'
वडिलांचा वारसा चालविण्याची संधी : रितेश
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितेश नाईक व रॉय नाईक यांनी स्व. रवी नाईक यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तपोभूमी येथे जाऊन स्वामी ब्रम्हेशानंद यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नगरसेवक आनंद नाईक व रूपक देसाई उपस्थित होते.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितेश नाईक यांनी पक्षाचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
माझ्या वडिलांनी जो राजकीय वारसा निर्माण करून ठेवला आहे, तो पुढे येण्याची संधी मला मिळाली आहे. लोकांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी १०० टक्के प्रयत्न करेन. त्यांच्या स्वप्नातील फोंडा घडवण्यासाठी मी सदोदित प्रयत्नशील राहीन.
फोंडा भाजपमध्ये आम्ही सर्व एकत्र असून विश्वनाथ दळवी यांच्या सहकार्यानेच ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. मगो-भाजप युती असल्याने मगोचे मला पाठबळ मिळणार आहे. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांचा आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी आहे.