बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:04 IST2026-02-05T10:04:08+5:302026-02-05T10:04:41+5:30
राज्यात आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी केली आहे.

बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना तीन ते सहा महिन्यांचे मोफत कौशल्य प्रशिक्षण व हमखास रोजगार दिला जाईल. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यात आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी केली आहे.
दुसरीकडे 'सरकार तुमच्या दारी,' उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून येत्या ६ रोजी फोंड्यात राजीव कला मंदिरात पहिला कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. माझ्या सरकारच्या कार्यकाळात 'सरकार तुमच्या दारी'चे १८ ते १९ कार्यक्रम झाले. प्रत्येक कार्यक्रमाला दोन ते अडीच हजार लोक त्यांच्या अडी-अडचणी घेऊन येत असत. उपस्थितांपैकी ८० टक्के लोकांच्या समस्या या उपक्रमातून आम्ही दूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकार व राज्यातील ग्रामीण विकास यंत्रणा दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना राबवत असून उद्योगाला लागणारे मनुष्यबळ तयार केले जात आहे. हाउसकीपिंग, फ्रंट ऑफिस, वेअर हाऊसिंग, रिटेल सेल आदी नोकऱ्या यामुळे निर्माण होऊ शकतील. उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल, तसेच मोफत गणवेश, जेवण व शैक्षणिक साहित्यही विनामूल्य पुरवले जाईल. वसतिगृहामध्ये निवास व्यवस्थाही मोफत केली जाईल, असेही ते म्हणाले.
वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पार्टिसिपेशन आयडेंटिफिकेशन प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने द्यावे लागेल, तसे निर्देश पंचायतींना मी दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. पर्यटन, आरोग्य क्षेत्र, आयटी, लॉजिस्टिक या क्षेत्रात रोजगारासाठी मनुष्यबळ निर्माण केले जाईल.
१३ प्रशिक्षण कार्यशाळा आतापर्यंत झालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता आठवी ते दहावी असली तरी सुद्धा पदवीधर उमेदवार देखील लाभ घेऊ शकतात.
७०% प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना शंभर टक्के रोजगार मिळेल याची ग्वाही सरकार देत आहे. काही पंचतारांकित हॉटेलची सरकारने हात मिळवणी केलेली आहे.