सावध व्हा, सत्याग्रह करण्यास भाग पाडू नका: फर्दिन रिबेलो; फोंड्यातील सभेत थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:34 IST2026-03-13T09:33:21+5:302026-03-13T09:34:25+5:30
सरकारने विरोधात पावले उचलल्यास संघर्ष अटळ

सावध व्हा, सत्याग्रह करण्यास भाग पाडू नका: फर्दिन रिबेलो; फोंड्यातील सभेत थेट इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : जे लोकांना नको, तेच लादण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे. लोकांना गोवा वाचवायचा आहे, मात्र सत्ताधाऱ्यांना गोव्याची विल्हेवाट लावायची आहे. विकासाच्या नावाखाली गोव्याच्या भवितव्यालाच सुरुंग लावण्याचे काम होत आहे. परंतु, जनता मूर्ख नाही हे सरकारने लक्षात घ्यावे. दहा महिन्यानंतर निवडणुका होतील. त्या पूर्वी लोकांना हवे तेच निर्माण करण्याचा प्रयत्न करा. लोकांच्या विरोधात जाऊन पावले उचलणार असाल तर संघर्ष अटळ आहे. आंदोलनाच्या पुढे जाताना एक मोठा सत्याग्रह गोव्यात उभा राहू शकतो, असा इशारा निवृत्त न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी सरकारला दिला.
'इनफ इज इनफ' चळवळीच्या फोंडा येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हृदयनाथ शिरोडकर, स्वाती केरकर, देविदास आमोणकर व संजय नाईक आदी उपस्थित होते.
सरकारच्या धोरणावर टीका करताना न्या. रिबेलो म्हणाले की, कोमुनिदाद या गावाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आहेत. त्या जमिनी असोत किंवा अन्य, जागा रुपांतरित करताना काही नियम आहेत. नियम सरकारनेच तयार केले आहेत. मात्र, वेगळ्या मार्गान मोठ्या प्रमाणावर जमिनींची रूपांतरे होत आहेत. सरकारमध्ये सामील असलेल्या लोकांकडूनच जागा रूपांतरित करण्यासाठी अर्ज आले आहेत. त्यामुळेच सरकार वेगवेगळी कलमे आणून कायद्यामध्ये पळवाटा शोधत आहे.. सरकार कायद्यांची थट्टा करत आहे.
आम्हाला विकास हवा आहे. मात्र त्या अगोदर साधन सुविधा, नैसर्गिक जलस्त्रोत, पर्यावरण या सर्वांचा अभ्यास करा. अजून काही शोषून घेण्याची क्षमता आमच्या पर्यावरणात आहे का, याचा अभ्यास करा. या गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्यास गोव्यात आणखी मेगा प्रकल्प येणारच नाहीत, असे न्या. रिबेलो यांनी सांगितले.
पोखरून घरे बांधली नाहीत. आमच्या पूर्वजांनी कधीच डोंगर कारण त्यांना डोंगरदऱ्यांचे महत्त्व माहित होते. मात्र आज सरकारी अनास्थेमुळे डोंगर पोखरले जात आहेत. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक जलस्त्रोताचा अंत अटळ आहे. मुळात हे डोंगर कोण विकत घेतो, याचा अभ्यास व्हायला हवा व डोंगर पोखरत असताना सरकारी यंत्रणा काय करते याचा पण विचार व्हायला हवा, असेही निवृत्त न्या. रिबेलो म्हणाले.
कॅसिनोचा मुद्दा घेत निवृत्ती न्या. रिबेलो म्हणाले की, ७५ लोकांची क्षमता असलेल्या कॅसिनोच्या जागेवर दोन हजार क्षमतेचा कॅसिनो येत आहे. सरकारी यंत्रणेने यावर मोहर उमटवलेली आहे.
मात्र मुख्यमंत्री म्हणतात की नवा कॅसिनो येणार नाही. लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न बंद करा. ऐतिहासिक जनता हाऊसच्या वरच्या मजल्यावरच एक मोठा कॅसिनो येणार असल्याची माहिती मिळत आहे.
युगांक नायक यांनी सांगितले की, भाऊसाहेब बांदोडकर हे कधीच दिल्लीच्या यंत्रणेसमोर झुकले नाहीत. मात्र, आज गोव्याची संपूर्ण यंत्रणा दिल्लीच्या पंख्याखाली आली आहे की काय असा संशय येऊ लागला आहे. किनारपट्टी गिळंकृत केल्यानंतर आज हिन्टरलँड टुरिझम नावाखाली त्यांचा डोळा ग्रामीण भागातील जमिनीवर आहे. आदिवासी बांधवांच्या जमिनी धोक्यात आहेत.
डॉ. दत्ताराम देसाई म्हणाले की, सावईवेरे सारख्या भागात प्रचंड जलसाठे होते, आज तिथे पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे इथे आता एकही प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही. जमीन विक्रीसाठी कडक कायदे करण्याची वेळ आली आहे.
यावेळी स्वाती केरकर, राजदीप नाईक, संदीप पारकर, रिवा पिरीस, संचित पालकर, देवेंद्र चारी, नरेश नाईक (उसगाव). संजय नाईक (भोमा), राजाराम पारकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी आपआपल्या परिसरातील विषय काढले. प्रास्ताविक हृदयनाथ शिरोडकर यांनी केले. निवृत्त न्यायाधीश रिबेलो यांची ओळख देविदास आमोणकर यांनी केली.