'एसआयआर' नंतर तब्बल सव्वा लाख नावे वगळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:23 IST2026-02-28T12:23:13+5:302026-02-28T12:23:13+5:30
नावांची तत्काळ पडताळणी करा : एसआयआर मॉनिटर ग्रुपचे आवाहन

'एसआयआर' नंतर तब्बल सव्वा लाख नावे वगळली
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विशेष पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर अनेक खरे व पात्र मतदार यादीतून वगळले आहेत. एकूण १ लाख २७हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, यात गेली अनेक वर्षे मतदान करणाऱ्या काही पात्र मतदारांची नावेही लहान चुकीमुळे वगळण्यात आली आहे.
नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची तत्काळ पडताळणी करावी, असे आवाहन एसआयआर मॉनिटर ग्रुपतर्फे शुक्रवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन केले. यावेळी एल्विस गोमस्, काँग्रेसचे सावियो कुतिन्हो, राधिका देसाई व इतर सदस्य उपस्थित होते.
एल्विस गोम्स म्हणाले, निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणारी एसआयआर ही मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठीची नियमित प्रक्रिया असून यात मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट नावे वगळून पात्र मतदारांचा समावेश केला जातो.
पण ४ नोव्हेबर ते २१ फेब्रुवारीपर्यंत केलेल्या एसआयआर मोहिमेत अनेक नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. यात बीएलओ, बीएलए यांनी काही लोकांची नावे काही लहान चुकांमुळे मतदार यादीत घेतली नाही. त्यामुळे आता पुढचा एसआयआर येणार त्यावेळी लोकांना आपली नावे मतदार यादीत मिळणार नाही.
त्यामुळे आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा विषयी त्यांच्याकडे मांडला असून, त्यांनी ज्या लोकांची नावे वगळली आहे त्यांनी पुन्हा नावासाठी आवाहन करण्यास सांगितले आहे, पण आवाहन अर्जही उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले.
काही परप्रांतीयांची नावे जे मतदान दोन ठिकाणी असतात अशांची वगळली म्हणून काही अडचण नाही, परंतु काही स्थानिक व पात्र मतदारांची नावे वगळली आहे.
जसे पोतुगींज नावात बदल तसेच लग्न दुसरीकडे करून गेलेली नावे, सरकारी वसाहतीत राहणारे कर्मचारी नंतर वसाहत सोडून आपल्या गावी गेलेले त्यांची काही नावे वगळली आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अनेक नावे या मतदार यादीतून जाण्याची शक्यता आहे. हे लोकशाहीला घातक असून, यावर योग्य तो तोडगा राज्य निवडणूक आयोगाने काढावा, अशी मागणी आम्ही केल्याची माहिती गोमस् यांनी दिली.
नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा : साविओ कुतिन्हो
मतदार यादीत नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आवश्यक कागदपत्रांसह दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजचे आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतात आणि त्यामुळे काही पात्र मतदार अनवधानाने वगळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घेऊन यादी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे साविओ कुतिन्हो यांनी सांगितले.