काय करायचेय ते खुशाल करा; आम्ही निर्णयावर ठाम, चिंबलवासीयांचा २६व्या दिवशी निर्धार कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 07:24 IST2026-01-23T07:22:28+5:302026-01-23T07:24:39+5:30
सरकारवर जोरदार टीका

काय करायचेय ते खुशाल करा; आम्ही निर्णयावर ठाम, चिंबलवासीयांचा २६व्या दिवशी निर्धार कायम
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाच्या विरोधात चिंबलवासीय ठाम आहेत. आम्ही अद्याप उपोषण, धरणे आंदोलन बंद केलेले नाही. सरकारने आम्हाला दोनवेळा केवळ दिशाभूल करण्यासाठी बोलावले आणि फसवले. पण आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणारच नाही. सरकारला जे काय करायचे आहे ते सरकारला करु दे. आम्ही देखील आता आम्हाला जे हवे तेच करणार आहोत, असा ठाम निर्णय चिंबलवासियांनी घेतला आहे.
कदंब पठारावर युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाच्या विरोधात चिंबलवासियांनी उपोषण, धरणे आंदोलन सुरुच ठेवले आहे. गुरुवारी या आंदोलनाचा २६वा दिवस आहे. यावेळी दररोज येथे स्थानिक महिला, युवक, ज्येष्ठ व्यक्ती आपली उपस्थिती लावतात. तसेच त्यांच्यासोबत आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोविंद शिरोडकर व अजय खोलकर देखील यावेळी पूर्णवेळ असतात. दरम्यान, गुरुवारी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आहे.
सरकारने केली दिशाभूल
अजय खोलकर म्हणाले, आता आम्ही आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा आम्हाला चर्चेसाठी बोलावले. त्यामुळे आम्ही मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे जात चर्चा केली. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाच नाही. आम्ही चलो विधानसभा बॅनर अंतर्गत विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला मेरशी जंक्शनजवळ अडविण्यात आले. आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटायला यावे, असा आग्रह धरला तेव्हा ते आले, पण ठोस आश्वासन दिले नाही. पण आता आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.
निर्णय घेतले, दोन दिवसांत कळवू
आंदोलनाच्या पुढील नियोजनाबाबत बोलताना खोलकर यांनी सांगितले की, एकतर आता आम्ही ठरविले आहे की, मुख्यमंत्र्यांना भेटायला किंवा चर्चेसाठी जाणार नाही. आम्ही ग्रामस्थांशी बोलून काही ठोस निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय नेमके कुठले? ते येत्या दोन ते तीन दिवसात सरकारला कळणार आहोत. आम्ही आत्ताच यावर काहीच बोलणार नाही.