राज्यभरातील तरुणाई अवतरली गडचिरोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:39+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीही यावेळी उपस्थित राहील.

राज्यभरातील तरुणाई अवतरली गडचिरोलीत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात आयोजित राज्यस्तरिय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’साठी राज्यभरातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक गडचिरोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा परिसर तरुणाईने फुलून गेला आहे. सोमवार दि.२ रोजी सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीही यावेळी उपस्थित राहील.
रविवारी सकाळपासून विविध विद्यापीठांच्या चमू आपापल्या वाहनांनी गडचिरोलीत दाखल होत होत्या. काही चमू तर शनिवारी रात्रीच गडचिरोलीत पोहोचल्या आहेत. त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे वसतिगृह, कृषी महाविद्यालय, महिला आर्थिक विकास मंडळाचे सभागृह, तसेच येणाऱ्या अतिथींची व्यवस्था शासकीय विश्रामगृह आणि हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे.
प्रथमच राज्यस्तरिय महोत्सव ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन करण्याचा बहुमान यावर्षी गोंडवाना विद्यापीठाला मिळाला आहे. पाच प्रकारच्या कलाप्रकारातील २६ स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी कलावंत कलेचे सादरीकरण करणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्दी असणाºया गडचिरोलीकर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
दि.६ ला बक्षीस वितरण व महोत्सवाचा समारोप होणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते विजेत्या चमूंना बक्षीस वितरण होणार आहे.
‘गडचिरोली जसे वाटले होते त्यापेक्षा चांगले’
राज्यातील विविध २० विद्यापीठांचे संघ या सांस्कृतिक युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत. त्यातील बहुतांश युवक-युवती प्रथमच गडचिरोलीत आले आहेत. नक्षलग्रस्त, मागास गडचिरोलीत जाताना त्यांच्या मनात विविध कल्पना होत्या. आपली योग्य व्यवस्था होणार का, याबद्दलही काहींच्या मनात शंका होती. मात्र गडचिरोलीत आल्यानंतर येथील व्यवस्था, योग्य आदरातिथ्य पाहून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया काही चमुंनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली. गडचिरोलीबद्दल जसा विचार केला होता त्यापेक्षा चांगले असल्याचे ते म्हणाले.