क्रांतिवीरांचे कार्य देश हितासाठी
By Admin | Updated: November 19, 2016 02:01 IST2016-11-19T02:01:06+5:302016-11-19T02:01:06+5:30
ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे.

क्रांतिवीरांचे कार्य देश हितासाठी
सत्यनारायण कोडापे यांचे प्रतिपादन : राजाराम येथे बिरसा मुंडा जयंती व समाज प्रबोधन
राजाराम : ब्रिटिश राजवटीत जमीनदार, भांडवलदार यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे अमूल्य योगदान आहे. स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीरांनी केलेले कार्य देशहिताचे होते, असे प्रतिपादन सत्यनारायण कोडापे यांनी केले.
राजाराम येथे बिरसा सेना व जंगोम दल यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात कोडापे बोलत होते. या कार्यक्रमाला सरपंच ज्योती जुमनाके, उपसरपंच संजय पोरतेट, सामाजिक कार्यकर्ते सामय्या करपेत, तलाठी राहुल पोरतेट, महेश मडावी, पत्तीगावचे प्रतिष्ठीत नागरिक दुर्गा आलाम, भगवान मडावी, विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, महादेव आत्राम, ग्रा. पं. सदस्य सुधाकर आत्राम, रवींद्र सोयाम उपस्थित होते.
चुटुगुंटाचे माजी सरपंच दिवाकर वेलादी म्हणाले, आदिवासी समाज आपली संस्कृती विसरून दुसऱ्या संस्कृतीचे अंगिकरण करीत आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाचा विकास साधावा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता मंदिरात सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर गावातून रॅली काढण्यात आली. प्रबोधन कार्यक्रमाचे संचालन जी. के. मडावी, प्रास्ताविक भास्कर तलांडे तर आभार तिरूपती कुळमेथे यांनी मानले. सोयाम, सडमेक, सुधाकर सोयाम, नागेश कन्नाके, यशवंत कन्नाके, राकेश तलांडे, प्रिया पोरतेट, आरती आत्राम यांनी सहकार्य केले. यावेळी पत्तीगाव, चिरेपल्ली, कोडसेलगुडम, कमलापूर, गोलाकर्जी येथील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)