रखडलेली कामे मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:23+5:30
अहेरीपासून राजकीय कारकिर्दीचे सुरूवात केल्यानंतर मिनी मंत्रालय समजल्या जाणाºया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा चढत्या राजकीय आलेखामुळे अजय कंकडालवार यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेली अडीच वर्षे जि.प.चे उपाध्यक्षपद सांभाळताना त्यांच्या कामाला मर्यादा होत्या. पण आता अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या कामकाजाची दिशा ‘लोकमत’ने जाणून घेतली.

रखडलेली कामे मार्गी लावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, कृषी आदी विभागांमधील कामांना गती देण्यासोबतच समाजकल्याण विभागाचा ढेपाळलेला कारभार वठणीवर आणून कामांना गती देण्याचा निश्चय नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार आणि उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते ‘लोकमत’शी बोलत होते.
अहेरीपासून राजकीय कारकिर्दीचे सुरूवात केल्यानंतर मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा चढत्या राजकीय आलेखामुळे अजय कंकडालवार यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेली अडीच वर्षे जि.प.चे उपाध्यक्षपद सांभाळताना त्यांच्या कामाला मर्यादा होत्या. पण आता अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या कामकाजाची दिशा ‘लोकमत’ने जाणून घेतली. यावेळी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून दोन्ही पदाधिकारी एकदिलाने काम करणार असल्याचा संदेश दिला.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही. काही ठिकाणी नुसत्याच टाक्या उभ्या आहेत. पाणी पुरवठा योजना बंद आहे त्या मार्गी लावल्या जातील. १३ ते १४ नवीन आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य केंद्रांच्या इमारतींसह शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांचा फटका जि.प.शाळांना बसत असल्याचे कंकडालवार म्हणाले. शिक्षकांच्या पदभरतीसाठी आणि विविध कामांच्या निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आलापल्लीत होणार क्रीडा संमेलन
गेल्या दोन वर्षांपासून काही पदाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे होऊ न शकलेले शालेय विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा संमेलन यावर्षी नक्की होणार असून ते आलापल्लीत घेतले जाईल, असे अजय कंकडालवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात शिक्षण समितीने क्रीडा संमेलन घेण्याचा ठराव घेतल्यानंतरही तत्कालीन अध्यक्षांनी हे संमेलन होऊ दिले नाही. त्यात खेळाडू विद्यार्थ्यांचीही कुचंबना झाली. पण आता असे होणार नसल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे यासंदर्भात आजच ठराव घेत असल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी दिली.