लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असताना शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण दरमहा ग्राहकांना वीज बिल पाठविते, तसेच वीज बिलाचा भरणा वेळेत न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असले तर आम्ही वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुरुस्तीसाठी ग्रामीण भागात नागरिकांची गैरसोय
- ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे अनेक गावात वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही.
- परिणामी दुसऱ्या गावात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वीज दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याचे वास्तव आहे. प्रत्येक गावात महावितरण कर्मचारी नेमावे.
विजेची मागणी वाढली किती पुरवठा किती?विजेची मागणी उन्हाळ्यात अधिक असते. त्यामुळे महावितरणने उन्हाळा लागण्यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र दरवर्षी उन्हाळा आणि विजेची लपंडाव हे समीकरणच तयार झाले आहे. विजेच्या मागणीनुसार पुरवठा होत नाही. परिणामी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात सुरू झाले भारनियमनग्रामीण भागात तर विजेसंबंधी विविध समस्या आहेत. कधी वीज येते, आणि कधी जाते. हे ग्रामीण भागातील नागरिकांना समजायला मार्ग नाही. एक प्रकारे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू असल्याची ओरड ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची आहे.
विजेच्या लपंडावाची काय आहेत कारणे ?
- मेंटेनन्सची कामे : महावितरण मेंटेनन्सची कामे सुरू आहेत, असे सांगून विविध भागांतील वीजपुरवठा तासनतास बंद ठेवत आहेत.
- ब्रेकडाऊनचा प्रकार : महावितरणचे ब्रेकडाऊन तर पाचवीलाच पुजले आहे. ब्रेकडाऊननंतर वीजपुरवठा बंद होत असून, अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो.
- मागणी जास्त पुरवठा कमी : यावर्षी मार्च महिन्यापासूनच ऊन तापले. एप्रिल तर हीट ठरला आहे. अशा वेळी दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा बंद केला जात असल्याने रोष व्यक्त होत आहे.
शहरातही लपंडावशहरातही विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कधी सकाळीच तर कधी रात्री अचानक वीज गुल होत आहे. भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित राहत आहे. रात्रीही अनेकवेळा वीज खंडित होत असल्याने झोपमोड होत आहे.