शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:46 IST2018-09-19T01:46:05+5:302018-09-19T01:46:47+5:30

गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह धरणाचे पाणी धानपिकासाठी मागील तीन दिवसांपासून सोडण्यात आले आहे. मात्र कमी दाबामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही.

Water should reach the last field | शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार

शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार

ठळक मुद्देआमदारांच्या प्रयत्नांना यश : ईटियाडोह प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह धरणाचे पाणी धानपिकासाठी मागील तीन दिवसांपासून सोडण्यात आले आहे. मात्र कमी दाबामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. सध्या पावसाने दडी मारली असल्यामुळे धान पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आ. कृष्णा गजबे यांनी ईटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एच.वाय.छपरघरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अभियंता छपरघरे यांनी ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचेल अशी ग्वाही दिली.
आरमोरी तालुक्यातील कासवी, आष्टा, अंतरंजी, आरमोरी, रवी, अरसोडा, वघाळा, सायगाव, शिवनी, पालोरा तसेच देसाईगंज तालुक्यातील आमगाव, सावगी, कोकडी, तुळशी, कुरुड, कोंढाळा, देसाईगंज, उसेगाव, एकलपूर, विसोरा, फरी, शिवराजपूर आदी गावालगतच्या शेतजमिनीला ईटियाडोह प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळतो.
गडचिरोली जिल्ह्याला या धरणातील ४० टक्के पाणी वाटा मिळतो. २०० क्युसेक (विसर्ग) पाणी सोडले जायचे. परंतु आता २७५ ते ३०० क्युसेक पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती अभियंत्यांनी दिली. सध्या मागील तीन दिवसांपासून मिळत असलेल्या पाण्याचा दाब कमी असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागत होता. शेतकऱ्यांनी या संदर्भात आ. गजबे यांची भेट घेऊन माहिती दिली होती. यामुळे आमदार गजबे यांनी ईटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता छपरघरे यांची भेट घेतली व पुरेसे पाणी सोडण्याच्या सूचना केल्या.
बुधवारपासून पाणी पूर्वरत होणार असून याचा लाभ वडसा व आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतजमिनीला मिळणार आहे, अशी माहिती आ.कृष्णा गजबे यांनी दिली.

Web Title: Water should reach the last field